अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड

अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, द्राक्ष बागेवर चालविली कुऱ्हाड
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, द्राक्ष बागेवर चालविली कुऱ्हाड

नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून द्राक्ष बागेचा हा डोलारा उभा केला होता. काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेत दोन पैसे ही कमावले. मात्र नैसर्गिक संकटांचा सामना करत बचत केलेले थोडेफार पैसे सर्व खर्च झाले. बागांच्या नियोजनात रात्रंदिवस कष्टाची जोड दिली. एवढं करून दर्जेदार उत्पादन डोळ्यासमोर असताना मॉन्सूनोत्तर पावसामुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. सारखा पाऊस होत असल्यानं आलेल्या द्राक्ष मालाची सड झाली. आता मात्र हाती काहीच उरले नाही. या नैराश्यातून सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी त्र्यंबक दादाजी भामरे व त्यांचा मुलगा प्रशांत याने जड अंतःकरणाने स्वतः द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवीत बाग तोडून टाकली आहे.

त्र्यंबक दादाजी भामरे यांना २ एकर शेती. त्यात पीक म्हणून द्राक्षांची निवड केली. दोन एकर क्षेत्रावर थॉमसन वाणांची २ एकर बाग होती. या वर्षी हंगाम घेताना खर्च झाला. त्यात मागील वर्षी गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला. सिंचनासाठी पाणी नसल्याने प्रति टँकर ७०० रुपयांप्रमाणे पाणी विकत घेऊन बागा जगविल्या. 

या मोठ्या परीक्षेनंतर पुन्हा हंगाम उभा करण्यासाठी आतापर्यंत एकरी ३ लाख म्हणजे २ एकरासाठी ६ लाख रुपये खर्च केला. मात्र दिवाळीत भाऊबिजेच्या दिवशी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) मुसळधार पाऊस झाला. सलग दोन दिवस चाललेल्या या पावसाने सर्व स्वप्न धुळीस मिळाले. संपूर्ण खर्च आता मातीमोल झाला आहे. हातचं सर्व भांडवल खर्च तर झालंच मात्र आता काहीच हाती न उरल्याने त्र्यंबक भामरे यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय घेतला. 

‘‘इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च अधिक असल्याने बँकेचे कर्ज, सोने नाणे मोडून अन् प्रसंगी उसनवारी करून बाग उभी केली. यावरच कुटुंबाचा रोजगार व अर्थकारण अवलंबून आहे. 

मात्र मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक समस्यांशी लढत बागा जगविल्या. थोडेफार पैसे मिळाल्याने बाग जगवीत कुटुंब चालविले. मात्र या बागांना माॅन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. आता हिंमत राहिली नाही, पुन्हा पुढील हंगाम करण्यासाठी भांडवल कुठून आणायचा हा प्रश्‍न त्यांच्या समोर होता, या मन स्थितीतच हा निर्णय घेतला. 

मागील वर्षी ७ लाख उत्पन्न मिळाले होते. खर्च जाऊन थोडेफार पैसे उरले होते, त्यातून घरखर्च, उधाऱ्या दिल्या. मात्र आता हाती काहीच उरलेलं नाही. आमच्या भागात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे’’, असे भामरे सांगतात.

आमच्यावर भयानक परिस्थिती आहे, हे नुकसान आता सोसवत नाही. येणाऱ्या काळात पुन्हा कसे उभे राहायचे हा मोठा प्रश्‍न आहे. आता खर्च झाला पुढच्या वर्षी एवढा खर्च कसा करणार? सरकारने आता नुकसानभरपाई द्यावी, नाहीतर कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, तरच आम्ही उभे राहू शकू, नाहीतर पुढे विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.  - प्रशांत भामरे, युवा शेतकरी, पिंगळवाडे, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com