जळगाव जिल्ह्यात थेट बाजारासाठी शेतकरी गट उत्सुक

शहरात शेतकरी बाजार सुरू करण्यासाठी आव्हाणे (ता. जळगाव), आसोदा, करंज भागातील शेतकरी गट उत्सुक आहेत.
farmer market
farmer market

जळगाव ः ग्राहकांना दर्जेदार, आवाक्‍याच्या दरातील भाजीपाला उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळता यावे यासाठी शहरात शेतकरी बाजार सुरू करण्यासाठी आव्हाणे (ता. जळगाव), आसोदा, करंज भागातील शेतकरी गट उत्सुक आहेत. परंतु त्यांना कृषी विभाग, जिल्हा प्रशासन यांचे सहकार्य मिळत नसल्याने हा बाजार सुरू होत नसल्याची स्थिती आहे. 

शेतकऱ्यांना कवडीमोल दरात बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे याच भाजीपाल्याची अव्वाच्या सव्वा दरात शहरात विविध भागात खरेदीदार, किरकोळ विक्रेते ग्राहकांना विक्री करीत आहेत. यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. तर शेतकऱ्यांना या अधिक दरांचा कोणताही लाभ होत नसल्याची स्थिती आहे. 

बाजार समितीमध्ये वांग्यांची आठ ते १० रुपये प्रतिकिलो दरात विक्री होत आहे. तर या वांग्यांची विक्री २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो दरात किरकोळ विक्रेते शहरात ग्राहकांना विक्री करीत आहेत. बटाट्याला बाजार समितीत कमाल १२ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. तर त्यांची किरकोळ विक्रेते थेट ५० रुपये प्रतिकिलो दरात ग्राहकांना विक्री करीत आहेत. मिरची, काकडी, गिलके, मेथी, पालक, पोकळा, गवार, भेंडी या भाज्यांचीदेखील कवडीमोल दरात बाजार समितीमध्ये विक्री होत आहे. तर याच शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केलेल्या भाज्यांची अव्वाच्या सव्वा दरात किरकोळ विक्रेते जळगाव शहर व इतर भागात विक्री करून लूट करीत आहेत. याकडे प्रशासन लक्ष देत नाही. 

महागाई वाढल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे. यात शेतकरी ते ग्राहक यांच्यात थेट व्यवहार व्हावेत, ग्राहकांचे नुकसान टाळता यावे यासाठी आव्हाणे येथील शेतकरी गटाचे समाधान रतन पाटील यांनी नुकताच जिल्हा प्रशासन व इतर यंत्रणांकडे शेतकरी बाजार शहरात भरविण्याची अपेक्षा व्यक्त केली. मोकळी जागा किंवा चौकात जागा उपलब्ध करून द्यावी. या भागात प्रशासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सींगचे पालन करून बाजार कार्यरत करू. ग्राहकहित लक्षात घेवूनच दर ठरवू. सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या ग्राहकांना रास्त दरात विक्री करू, असा प्रस्ताव पाटील यांनी ठेवला. परंतु त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. नाइलाजाने शेतकरी जळगाव बाजार समितीत आपल्या शेतमालाची कवडीमोल दरात विक्री करीत आहेत. 

बाजार समितीमध्ये एवढी गर्दी असते की सोशल डिस्टन्सींगचे कुठलेही पालन होत नाही. कोरोनाच्या भीतीने काही शेतकरी बाजारात भाजीपालाच आणत नसल्याची स्थिती आहे. ते गावात त्याची विक्री करीत आहेत. तर काही शेतकरी थेट पशुधनाला भाजीपाला खाऊ घालत आहेत. ही स्थिती प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे निर्माण झाली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकरी बाजारांना परवानगी, प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी गटांनी केली आहे.  ---------------- आम्ही शेतकरी बाजार भरविण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे ठेवला. अधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु त्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे ग्राहकांची मोठी लूट किरकोळ बाजारात सुरू आहे.  - समाधान पाटील, शेतकरी, आव्हाणे (ता.जळगाव)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com