देशी गायी सांभाळणारे शब्बीर मामू झाले ‘पद्मश्री’

देशी गायी सांभाळणारे शब्बीर मामू झाले ‘पद्मश्री’
देशी गायी सांभाळणारे शब्बीर मामू झाले ‘पद्मश्री’

नगर : आजोबा, वडिलांनी गायी सांभाळण्याची दिलेली परंपरा शब्बीर मामू जोपासत आहेत. दुधाळसह भाकड देशी गाईंचा मायेने सांभाळ करणारे शिरूर कासार (जि. बीड) जवळील दहिवंडी येथील शब्बीर बुढण सय्यद आता 'पद्मश्री' झाले आहेत. भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता. २५) पद्म पुरस्कार जाहीर केल्यानंतर शब्बीर सय्यद यांनी ‘जनावरे संभाळण्यात आनंद मिळतो. तिसरी पिढी यात काम करतेय. पद्मश्री पुरस्कार मिळाला अन्‌ जीवन सार्थक झाले’ अशी भावना व्यक्त केली. बीड या दुष्काळी जिल्ह्यामधील दहिवंडी हे नगर जिल्ह्याला लागून असलेले शिरूर कासार शहराजवळील खेडे. येथील वयाची सत्तरी ओलांडलेले शब्बीर बुढण सय्यद गेल्या देशी गायींचा संभाळ करतात. शिरूर कासार शहराच्या उत्तरेला भालगाव रस्त्यावर राहणारे शब्बीर बुढण सय्यद (वय ६०) हे रमजान, युसूफ या मुलांसह पत्नी, मुली यांच्यासोबत राहतात.  दहीवंडीला जाताना त्यांच्या दारात देशी गाई, बैल, शेळ्या-मेंढ्या नजरेस पडतात. मामू गाईंचा सांभाळ करतात ते त्यांच्यातला देव पाहून. आजोबा, वडील यांच्या गेल्या चार पिढ्यांपासून मुक्‍या जिवावर सय्यद मामूंच्या कुटुंबाचे प्रेम आहे. गाई, बैलांची ते कधीच विक्री करीत नाहीत. त्यांचे दूध, दही, तूपही विकत नाहीत. मातेच्या दुधावर हक्क असलेल्या त्यांच्या वासरांना कधीच दावं लावलं जात नाही. शेती नाही, त्यामुळे चारा, उन्हाळ्यात पाण्याच्या प्रश्‍नाची सगळीकडे बोंब असताना आजमितीला त्यांच्या दारात शंभराच्यावर गाई, बैल आहेत. त्यातील बहुतांश कसायांकडून सोडवणूक करून घेतलेली जनावरे आहेत. गोहत्येबद्दल त्यांना तिरस्कार आहे, मांसाहार करणे हेही ते पाप समजतात. ‘जनावरे सांभाळण्यात मी आनंद शोधला, आज तर जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले’, अशी भावना पद्मश्री शब्बीर सय्यद यांनी व्यक्त केली.

थेट पद्मश्री पुरस्कार भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेले शब्बीर सय्यद तसे समाजाकडून कायम दुर्लक्षित राहिले. चार पिढ्यांपासून देशी गाई सांभाळण्याचे काम करणारे सय्यद मामू यांचे हे एकमेव कुटूंब आहे. गाईंना चारा व अन्य मदत काही प्रमाणात लोकांकडून मिळालेली असली दिलेली असली तरी शिरूर कासार येथील डॉ. राजेश तांदळे यांच्या सिद्धेश्‍वर प्रतिष्ठानचा पुरस्काराचा अपवाद वगळता कोणताही पुरस्कार त्यांना मिळालेला नाही. मात्र आता त्यांना थेट ‘पद्मश्री’ मिळाला आहे. ‘सकाळ’ने मामूंचे कार्य आणले उजेडात.. समाजाकडून कायम दुर्लक्षित राहिलेल्या सय्यद मामूच्या गाईं संभाळण्याच्या कामांबाबत १ नोव्हेंबर २००७ रोजी ‘मुस्लिम कुटूंब करतेय साठ गांईंचा सांभाळ’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ ने पहिली बातमी प्रकाशीत केली आणि मामूंचे काम समाजासमोर आले. त्या वेळी मामूकडे साठ गाई होत्या. मात्र, त्या जनावरांना निवारा नव्हता. पिण्याच्या पाण्याची अडचण होती. ‘सकाळ'' च्या बातमीची दखल घेऊन शिरूर कासारचे राहिवासी व पुण्यात स्थायिक झालेले निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयश कासट यांच्यासह पुण्यातील तरुणांनी आर्थिक मदत देऊन गाईंसाठी निवारा शेड उभारले. त्यानंतरही ‘सकाळ’ ने सातत्याने मामुंच्या गोरक्षणावर प्रकाश टाकला. बारा वर्षांपूर्वी ‘सकाळ’ ने एका सामान्य माणसाचे काम समाजासमोर आणले आणि आज ते शब्बीर सय्यद मामू भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानीत झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com