संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील शेतकऱ्याने विकली शेती

पाण्याअभावी वाळत असलेली संत्रा बाग
पाण्याअभावी वाळत असलेली संत्रा बाग

अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या विहिरीवरून पाणी आणले तरी संत्रा बाग वाचविता आली नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग डोळ्यादेखत पाण्याअभावी जळत असल्याचे दुःख सोसवणारे नव्हते म्हणून १२ एकर शेतीच विकण्याचा निर्णय घेतला; अशी व्यथा नयाखेडा (ता. अचलपूर) येथील शेतकरी जानराव येवले यांनी मांडली. 

संत्रापट्टा पाण्याअभावी अडचणीत आला आहे. पाण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास संत्रा बागायतदार तयार आहेत. नयाखेडा येथील जानराव यावले हे देखील त्यापैकीच एक. बारा एकरांपैकी चार एकरांवर त्यांनी संत्रा लागवड केली आहे. संरक्षित विहिरीचा पर्याय त्यांच्याकडे होता. विहिरीला दरवर्षी पाणी राहत असल्याने त्यांनी संत्रा लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कमी होत गेलेल्या पावसामुळे पाणीपातळी खालावत गेली. यावर्षी तर विहिरीने तळ गाठला. आता संत्रा बागेचे काय? असा प्रश्‍न त्यांना भेडसावू लागला. पाणी मिळावे याकरिता त्यांनी एक एक करून तब्बल चार बोअरवेल खोदले. परंतु त्यांना पाणी लागण्याऐवजी डोळ्यातच पाणी दाटले, असे ते अगतिकपणे सांगतात.

चार बोअरवेलच्या खोदकामांवर त्यांचे तीन लाख रुपये खर्च झाले. त्यावरही हिंमत न हारता त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावरून पाणी आणले. शेजाऱ्याला विनवणी करून त्यांच्याकडूनही पाणी मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने हे सारे स्रोत कुचकामी ठरले. यापुढे निभाव लागणे शक्‍य नसल्याची जाणीव झालेल्या जानराव यावले यांनी शेवटी संपूर्ण शेतीच विकण्याचा निर्णय घेतला. संत्र्याची झाडे डोळ्यापुढे वाळल्याने मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे जवळपास वीस वर्षे मागे गेल्याची जाणीव होत असल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com