अवकाळीच्या दणक्याने वाढली चिंता 

चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कोकणात आंबा, मध्य महाराष्ट्रात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.
rain
rain

पुणे ः चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कोकणात आंबा, मध्य महाराष्ट्रात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. तर द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. अवकाळीच्या या दणक्यामुळे शेतकरी चिंतेत असून, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी पुढे येत आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई परिसरांत अवकाळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. काजू पिकालाही फटका बसला. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शनिवारीही सकाळपर्यंत काही भागांत रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती होती. 

मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी  पुणे, नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, खानदेशातील जळगाव भागात शुक्रवारी रात्री तुरळक सरी पडल्या. पुण्यामध्ये शनिवारी सकाळपर्यंत १९.३, पाषाण १९.२, तर लोहगाव येथे १९.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण निवळून ऊन पडल्याचे चित्र होते. झालेल्या पावसामुळे आंबेगाव, जुन्नर, खेड, नाशिक, नगर या भागांतील द्राक्ष पिकांचे चांगलेच नुकसान झाले. 

खानदेशात शुक्रवारी (ता.८) सायंकाळी धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. साक्री तालुक्यात २४ तासांत ६० मिलिमीटर पाऊस झाला. नवापूर, तळोदा भागांत ३० मिलिमीटर पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यात कुठेही जोरदार पाऊस झाला नाही, पण जळगाव, यावल, भुसावळ, चोपडा, धरणगाव, पारोळा, एरंडोल भागांत तुरळक पाऊस पडला. शनिवारी (ता.९) सकळीदेखील जळगाव, धुळे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे केळी काढणी, ऊसतोड, फवारणीची कामे ठप्प होती. 

मराठवाडा, विदर्भात कोरडे वातावरण  मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत तुरळक ठिकाणी हजेरी लावल्यानंतर आता या भागात हवामान काहीसे कोरडे झाले आहे. अधूनमधून ढगाळ हवामान होत असले तरी पाऊस पडण्यासारखी स्थिती नसल्याने शेतकरी आपआपल्या कामात गुंतले आहेत. अनेक ठिकाणी तुरीच्या काढणीला व मळणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच अचानक होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना चांगलीच सतावत आहे.  कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता  गेल्या सात, आठ दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निवळू लागले आहे. मराठवाडा, विदर्भात काही अंशी ऊन पडत असले, तरी मध्य महाराष्ट्र व कोकणात अंशत ढगाळ व अधूनमधून ऊन पडत असल्याची स्थिती आहे. आज (रविवारी) कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा भागांत काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. सोमवारपासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com