‘सीसीआय’च्या केंद्रांवर शेतकऱ्यांची परवड   

जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडाळातर्फे (सीसीआय) कापसाची आवक घेण्याचे नियोजन नसल्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.
parbhani
parbhani

परभणी ः  जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडाळातर्फे (सीसीआय) कापसाची आवक घेण्याचे नियोजन नसल्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. अनेक केंद्रांवर स्वतंत्र ग्रेडर नसल्याने शेतकऱ्यांना मोजमापासाठी आठवडाभर ताटकळत थांबावे लागत आहे. परिणामी, वाहन भाड्याचा भुर्दंड सोसावा लागतोय. तसेच तोलाई, हमालीची अनधिकृतरीत्या वसुली केली जात आहे. या गैरप्रकारांकडे संबंधित अधिकारी, कर्मचारी अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. या सर्व प्रकारांचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.  जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू,  मानवत, सोनपेठ, पूर्णा, ताडकळस सहा बाजार समित्यांतर्गत ‘सीसीआय’तर्फे कापूस खरेदी केली जात आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांतील कापसाची आवक या केंद्रांवर होत आहे. त्यामुळे संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची गोची होत आहे. बाजार समित्यांकडून मार्केटमध्ये आवक घेताना वाहनांवर केवळ क्रमांक टाकला जात आहे. खरेदी वाढल्याने मार्केट शुल्कात भर पडत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या गैरसोयीशी त्यांचे घेणे देणे नसल्याचे चित्र आहे. मोजमापानंतर आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक तसेच शेतकऱ्यांच्या छायाचित्रासह देयकाची पावती दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुलभ होत आहे. परंतु वजनमाप, वाहन खाली करण्यापेक्षा देयक पावत्या देण्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याने तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत आहे. व्यापाऱ्यांची चलती... अनेक व्यापारी मार्केट यार्डावर तसेच खेडा पद्धतीने आधारभूत किमतीपेक्षा ५०० ते ८०० रुपये कमी दराने खरेदी करत आहेत. मधुर संबंधातील एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर आधारभूत दराने कापूस विक्री करून नफा कमवत आहेत. वाहनातील कापूस खाली करण्यासाठी हे व्यापारी हमालांना पैसे देत आहेत. त्यामुळे हमाल शेतकऱ्यांकडून देखील वसुली करत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याने शेतकऱ्यांची गोची होत आहे.  प्रतिक्रिया ‘सीसीआय’ने कापूस खरेदीसाठी सर्व केंद्रांवर स्वतंत्र ग्रेडर नियुक्त करावेत. शेतकऱ्यांची आवक घेण्यासाठी नियोजन करावे. खरेदी बंद असल्यास बाजार समित्यांमार्फत कार्यक्षेत्रातील गावांतील शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पूर्वसूचना द्याव्यात. यामुळे शेतकऱ्यांना बसत असलेला भुर्दंड थांबू शकेल. - गजानन देशमुख, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, परभणी

वजनकाट्यावर वाहनाच्या प्रकारानुसार विशिष्ट रकम घेतली जात आहे. परंतु ती घेतल्याची नोंद पावतीवर केली जात नाही. वाहनातील कापूस खाली करण्यासाठी हमालदेखील पैसे मागत आहेत. याकडे केंद्र चालकांचे दुर्लक्ष होत आहे. - बाळासाहेब खापरे, रिडज, ता. जिंतूर

बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा कापूस प्राधान्याने खरेदी करावा. त्यासाठी ‘सीसीआय’ तसेच बाजार समित्यांनी एकत्रित नियोजन करावे. - शेषराव अंबिलगे, कुंभारी, ता. जिंतूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com