नगर ः श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या कोळगाव, चिखली, कोरेगाव, कोथूळ, घारगाव या भागांतील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतातील पिके पाणी असूनही वाळत आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी थेट महावितरणच्या उपकेंद्रावर धडक मारली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
कोळगाव परिसरातील गावांमध्ये विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांकडे जे पाणी आहे, त्यातून उभी पिके जगविण्याचे आव्हान आहे. त्यातच या भागातील शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. विजेअभावी त्यांच्याही चारा-पाण्याची हेळसांड होत आहे. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी कोळगावच्या उपकेंद्रावर एकत्र येत आवाज उठविला. योग्य दाबाने वीज देतानाच, भारनियमानाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता दीपक सिंग हे शेतकऱ्यांच्या आक्रमकपणामुळे बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम लगड यांनी दीपक सिंग यांच्याशी चर्चा केली. लोणी व्यंकनाथ येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. चिखलीतील मंजूर उपकेंद्राचे काम करण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.