शेतकरी संपाने मुंबई, नाशिकला शेतमालाची आवक घटली

शेतकरी संपाने मुंबई, नाशिकला शेतमालाची आवक घटली
शेतकरी संपाने मुंबई, नाशिकला शेतमालाची आवक घटली

पुणे : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या शेतकरी संपात राज्यातील काही जिल्ह्यांत दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. महत्त्वाच्या मुंबई, नाशिक बाजार समित्यांत आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पुण्यात शनिवारी (ता.२) बाजार समितीस सुटी असल्याने आज (ता.३) आवकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे शेतकरी संघर्ष समितीने ७ जूनपासून आंदोलनात उतरण्याची घोषणा केल्याने संपाची तीव्रता वाढणार आहे.  नाशिकला ७० टक्के आवक कमी नाशिक : शेतकऱ्यांनी १ जूनपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीमध्ये जवळपास ७० टक्के भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक घटल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली; तर मुंबईकडे भाजीपाला घेऊन फक्त दहा वाहने गेली. त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे चार कोटींची उलाढाल मंदावली.  या आंदोलनाचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला. शुक्रवारपासून (ता.१) शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला नसला, तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला. यामध्ये शुक्रवारी भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक ७० टक्के कमी झाल्याचे दिसून आले. बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने भाजीपाल्याला दरदेखील चांगला मिळाला; तसेच मुंबईला नाशिकहून सर्वसामान्य दिवसात जवळपास ३५ ते ४० ट्रक भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे फक्त १२ ते १५ वाहने गेली तीदेखील संपूर्ण न भरता जसा भाजीपाला उपलब्ध झाला त्या पद्धतीने पाठविण्यात आला. दरम्यान, सुरू झालेल्या आंदोलनाला दिवसभरात जिल्ह्यात कुठेही गालबोट लागले नसल्याने शनिवारी (ता.२) बाजार समितीत भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात वाढली. मात्र संपामुळे पुढील काही दिवस आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलन १० जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुन्हा रस्त्यावर : डॉ. नवले मुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तुरीवरून राज्य सरकार विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. या संदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ. अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  डॉ. नवले म्हणाले, की राज्यात शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाने ठरवून दिलेला प्रतिलिटर २७ रुपये दर मिळत नाही. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार गुजरात आणि कर्नाटकच दूध पायघड्या घालून महाराष्ट्रात आणत आहे. साखरेचे दरही कोसळलेले आहेत. राज्यात तूर खरेदी थांबली आहे. तरीही सरकारकडून पाकिस्तानातून साखर आणि मोझांबिकमधून तूर आयात केली जात आहे. दूध उत्पादक, ऊस उत्पादक, तूर उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात निर्लज्ज सरकार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांबद्दल चांगल्या निर्णयांची अपेक्षा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. याचा निषेध म्हणून येत्या ५ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर निषेध आंदोलन करणार आहोत. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुजरात आणि कर्नाटकमधील राज्यात येत असलेले दूध, पाकिस्तानची आयात साखर आणि मोझांबिकची तूर तहसीलदार कार्यालयामार्फत फडणवीस सरकारला भेट म्हणून पाठवणार आहोत. त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास ७ जूननंतर शेतकऱ्यांनी शहरांचा भाजीपाला आणि दूधपुरवठा रोखावा, असे आवाहन आहे. ७ जूननंतर शेतकऱ्यांनी हा लढा स्वतःच्या हातात घेऊन शहरांचा पुरवठा थांबवावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यानंतर १० जूनला राज्यभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करून सरकारला औकात दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. तसेच १ जूनपासून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com