पुणे ः कोरोना संसर्गाचा बाऊ करून कोणताही ठोस पर्याय न देता मुंबई, पुण्यासह महत्वाच्या बाजार समित्याच बंद केल्याने राज्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट आणि भांडवलाचे सिंचन करून केलेला कोट्यवधी रुपयांचा भाजीपाला आणि फळे शेतातच नासत आहेत. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेल्या आणि अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या बाजार समित्या बंद करण्याचा व्यापारी, आडते यांसारख्या घटकांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आततायीपणाचा असल्याची टीका शेतकरी वर्गातून होत आहे. खरेदी-विक्रीच्या विकेंद्रीकरणासह अनेक पर्याय अवलंबून ही व्यवस्था सुरू नाही ठेवली तर शेतकऱ्यांचे नुकसान तर होईलच, त्याचबरोबर पुरवठा साखळी विस्कळित झाली तर ग्राहकांच्याही रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. लॉकडाऊनच्या काळात मजूर, वाहतूक, इंधन आदी संकटांवर मात करून मोठ्या शहरांतील बाजारात शेतीमाल पाठवून चार पैसे मिळत होते. परंतु, पुणे, मुंबई आणि यांसारख्या अन्य महत्वाच्या बाजारपेठा बंद केल्याने शेतमाल विक्री व्यवस्थाच कोलमडली आहे. फळे आणि भाजीपाला नाशवंत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. थेट विक्रीलाही मर्यादा असल्याने फळे आणि भाजीपाला फेकावा लागणार आहे. शेतकरी म्हणतात...
बाजार समित्या ‘बंद'चा परिणाम
या पिकांना बसतोय फटका फळे ः द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, चिकू, कलिंगड, खरबूज, पेरू, लिंबू भाजीपाला : मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, लालमाठ आदी फळभाज्या ः टोमॅटो, मिरची, कांदा, गवार, गाजर, वांगी, काकडी, भेंडी, कारली, दोडका, शेवगा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, बाटाटा बीट आदी.
प्रतिक्रिया सव्वा एकर क्षेत्रावरील कोबीचे पीक काढणीला आलेले आहे. परंतु मुंबई, पुण्याच्या बाजार समित्या बंद असल्याने माल तयार होऊनही आम्ही त्याची अद्याप काढणी केली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये जर कोबी काढला नाही तर खराब होण्याची दाट शक्यता आहे. सध्या आमच्याकडे विक्रीची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. जर मार्केट वेळेवर सुरू नाही झाले तर किरकोळ प्रमाणात विक्रीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. तेही जमले नाही तर कोबी उपटून त्याचे खत केरण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. म्हणून बाजार समित्या बंद ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून काही काळ तरी बाजार समित्या सुरू राहणे आवश्यक आहे. — उदय आलमाने, दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना हाफ पगार, फुल पगार मिळणार आहे. पण शेतकऱ्यांना काय मिळणार? शेतीमाल काढणीस तयार आहे, पण मार्केट बंद आहे. एकीकडे ग्राहकांना भाजीपाला मिळत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्यवस्था नाही. पिकात जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने त्याचे पंचनामे करून भरपाई द्यावी. अन्यथा बाजार समित्या चालू कराव्यात. — संदीप सुक्रे, प्रगतिशील शेतकरी, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे गावशिवारात पाण्याचे संकट असल्याने दुसऱ्या तालुक्यातील गावात पाण्याची सोय असलेली दहा एकर शेती ठोक्याने केली. या शेतीत चार एकरावर टोमॅटो, साडेपाच एकरात कांद्याची लागवड केली. दर दिवशी दीडशे ते दोनशे कॅरेट निघणारा टोमॅटो पुणे, सुरत, मुंबई, कल्याण, अमरावती, नांदेड, परभणी, नागपूर आदी ठिकाणी बाजारपेठेत पाठवायचो. परंतु आता या बाजारपेठा बंद आहेत. शेतीवर आठ लाख खर्च झाले अन् ते वसूल कसे करावे हा प्रश्न आहे. माल आहे पण काढता किंवा विकता येत नाही. सरकारनं आमची अडचण लक्षात घेऊन मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करण्यासह मजुरांना शेतीकामासाठी कोणत्याही गाव शिवारात जाण्यासाठी निर्भय वातावरण निर्माण होईल असे पाहावे. — संदीप गवळी, भाजीपाला उत्पादक, माळीवडगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.