जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात आहे...

मिरखेल येथील तरुण शेतकरी उमेश देशमुख यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. नुकसानीची विदारक स्थिती संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व्हिडिओव्दारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कवितेव्दारे आर्त हाक दिली.
Farmer's call; Just look, sir ...
Farmer's call; Just look, sir ...

परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी करूनही सततच्या पावसामुळे उभे सोयाबीन पीक सडून गेले आहे. संपूर्ण खर्च अक्षरशः पाण्यात गेला. त्यात वारंवार सूचना देऊनही कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी फिरकेनासे झाले. त्यामुळे अखेर मिरखेल येथील तरुण शेतकरी उमेश देशमुख यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. नुकसानीची विदारक स्थिती संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व्हिडिओव्दारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कवितेव्दारे आर्त हाक दिली.  

देशमुख यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित यंत्रणा गडबडून जाग्या झाल्या. सोमवारी (ता. १९) कृषी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतावर पोचले. पिंगळी महसूल मंडळात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या मंडळातील मिरखेल येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी, तूर, ऊस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. तब्बल अडीच महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे सखल भागातील पिकांतील पाण्याचा निचरा होत नसल्याने उभी पिके जागीच सडून गेली.

उमेश देशमुख यांच्यासह जनार्दनराव देशमुख, रामराव काचोळे, प्रदीप देशमुख, शिवाजी देशमुख, भारत कनकुटे,विठ्ठल देशमुख आदींसह या गावशिवारातील अर्ध्याहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे पाणी साचून नुकसान झाले आहे. त्यात प्रशासनाने केवळ ओढे, नाले, नद्या काठच्या पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे या समजताच या शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. परंतु त्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष्य केले. त्यामुळे उमेश देशमुख यांनी नुकसानीच्या दाहकतेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कविता सादर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली. प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वेदनेचे गांभीर्य नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. हा व्हिडिओ गेल्या तीन दिवसांत व्हॉटसअॅप, फेसबुक आदी समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या दुःखाप्रती सहानुभूती सूर आळविला गेला.

उमेश देशमुख मिरखेलकर यांच्या कवितेच्या ओळी जरासं पहा ना साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे, आयपीएलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे. या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा किती संकटात आहे, जरासं पहा ना साहेब पाणीच पाणी वावरात आहे. दुष्काळाचा सूर बापाच्या छाताडावर आहे, पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची पडझड झाली आहे.

सहा एकरवर तब्बल चारवेळा पेरणी करूनही अतिपावसामुळे उभे सोयाबीन पूर्णपणे सडून गेले आहे. काढणी शक्य नाही. ऐंशी हजार रुपये खर्च पाण्यात गेला. त्यामुळे तत्काळ पीकविमा परतावा मंजूर करावा. नुकसानीची व्याप्ती लक्षात घेऊन सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी. - उमेश देशमुख, मिरखेल, जि. परभणी

दीड एकर मूग पावसामुळे हाती लागला नाही. आता अडीच एकर सोयाबीन देखील पाण्यामुळे वाया गेले. सरकारने तत्काळ मदत केली तर शेतकरी रब्बी पेरणीसाठी कसेबसे उभे राहतील. - भारत कनकुटे, मिरखेल, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com