संत्र्याच्या फळगळीने त्रासले शेतकरी; तोडल्या बागा 

अमरावती : सततच्या फळगळीने त्रासलेल्या तब्बल पाच शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने संत्रा बागाच काढून टाकल्याच धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.
संत्र्याच्या फळगळीने त्रासले शेतकरी; तोडल्या बागा 
संत्र्याच्या फळगळीने त्रासले शेतकरी; तोडल्या बागा 

अमरावती : सततच्या फळगळीने त्रासलेल्या तब्बल पाच शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने संत्रा बागाच काढून टाकल्याच धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील माधान, कोदोरी, पवनी (संक्राजी), नांदगाव खंडेश्‍वर या गावात शेतकऱ्यांनी संत्र्याची फळगळ नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. 

अमरावती जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्राफळगळ हाताबाहेर गेली आहे. कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामार्फत फळगळतीचे निदान आणि नियंत्रणच होत नाही आणि यापुढील काळात हे सत्र असेच सुरू राहील, या नैराश्‍यातून शेतकरी संत्रा बागाच काढून टाकत असल्याचे विदारक चित्र अमरावती जिल्ह्यात आहे. माधान येथील संजय आवारे यांची १५ वर्षांची ५०० झाडांची संत्रा बाग होती. मात्र यंदा फळगळतीमुळे हाती काहीच आले नाही. उत्पादकता खर्च मात्र लाखात होता. परिणामी, हतबल झालेल्या संजय आवारे यांनी एक हजार रुपये प्रति तास याप्रमाणे जेसीबी भाडेतत्त्वावर घेत बाग काढून टाकली. 

येथीलच हतबल साहेबराव जगदेव मोहोड यांनी २००, कोदोरी येथील राजकन्या वसंतराव बोंडे यांनी ६००, तर रणजित वसंतराव बोंडे यांनीदेखील हतबलतेमुळे बागेतील संत्रा काढून टाकला. विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या वरुड तालुक्‍यातही नैराश्‍यातून शेतकऱ्यांनी संत्रा काढून टाकला. पवनी (संक्राजी) येथील बाळू ऊर्फ किशोर गोळे यांनी बागेतील दहा वर्षे जुनी ६०० संत्रा झाडे काढली. नांदगाव खंडेश्‍वर येथील दिनेश महादेव लांजेवार यांनी सव्वा एकरातील १७० झाडे काढून टाकली आहेत. 

उत्पादकता निम्म्यावर ! विदर्भाची सरासरी उत्पादकता पाच लाख टन असताना यंदाच्या हंगामात ती निम्म्यावर (दोन ते अडीच लाख टन) आल्याचे महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. त्यातच केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून फळगळतीवर पूरक उपाययोजनांची कोणतीच शिफारस करण्यात आलेली नाही. या सर्व कारणांमुळे संत्रा उत्पादक हवालदील झाल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया..  संत्रा बाग लावण्यापूर्वी सोयाबीन, हरभरा अशी पीक घेत होतो. पाण्याची मुबलकता असल्याने संत्रा लावला. या वर्षी दोन हजार क्रेट उत्पादकता अपेक्षित होती. परंतु फळगळतीमुळे तीनशे क्रेटपर्यंत खाली आली. फळगळतीवर उपाययोजनांबाबत सीसीआरआय आणि कृषी विद्यापीठ उदासीन आहे. परिणामी, बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला.  - संजय आवारे,  शेतकरी, माधान, अमरावती  -  गेल्या तीन वर्षांपासून फळगळ व इतर कीड-रोगांमुळे उत्पादकता प्रभावित झाली आहे. उत्पादकता खर्चही निघत नाही, अशी अवस्था आहे. या वर्षी झाडावर दोन ट्रक संत्री होती. मात्र फळगळ सुरू झाली आणि १०० क्रेट संत्री झाडावर उरली. त्यामुळे बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला.  - दिनेश लांजेवार  शेतकरी, एरंडगाव, अमरावती  -  ‘‘फळगळतीमुळे मोठे नुकसान झाले ही बाब नाकारता येत नसली, तरी बाग काढून टाकत आपले कायमचे होणारे नुकसान टाळले पाहिजे. त्याऐवजी शेतकऱ्यांनी फळगळतीवर संशोधनासाठी सीसीआर आणि कृषी विद्यापीठाला जाब विचारला पाहिजे. त्याकरिता सक्षम दबावगट तयार करण्याची गरज आहे.’’  - प्रदीप बंड,  शेतकरी, जसापूर, अमरावती   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com