बुलडाणा : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.
गेल्या खरीप हंगामात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एनडीआरएफकडूनसुद्धा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता. १७) केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
या पथकातील सदस्यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांवमाळ व देऊळगावराजा तालुक्यातील भिवगाव येथे भेट दिली. या ठिकाणी शेतकऱ्यांनी चर्चेदरम्यान विविध मुद्द्यांची मागणी केली.
या पथकात पथकप्रमुख अश्वनीकुमार, निती आयोगाच्या डॉ. बी. गणेशराम, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या डॉ. नंदिनी गोकटे नारखेडकर, दीनानाथ, फरीदाबाद येथील आर. डी देशकर, नागपूरचे डॉ. आर. पी. सिंग, सीसीआयचे उपमहाव्यवस्थापक एच. डी. टेंभुर्णे यांचा सहभाग होता. भेटीच्या वेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अामदार डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहसीलदार संतोष कणसे आदी उपस्थित होते.
बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकताच पहिल्या टप्प्यात ३५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एनडीआरएफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली अाहे. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले.
हे पथक तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेत आहे. डोंगराळ भागातील सावरगाव माळ येथे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. वन्यप्राणी या भागातील पिकांचे नुकसान करतात. त्यामध्ये रोही प्राणी महत्त्वाचा आहे. या प्राण्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागते. त्यामुळे या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप योजनेद्वारे पुन्हा पंप वितरण सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.