सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले. महापूर, अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी सावरतोय, तोच पुन्हा मॉन्सूनोत्तर पावसाने हातातोंडाला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे लागले आहेत. पण, काळजीवाहू सरकार केवळ पंचनाम्यांचा बागुलबुवा करण्यात मश्गूल आहे. पंचनाम्यांचा फेरा नको; तर सरसकट मदत द्या, अशीच मागणी हतबल शेतकरी करत आहेत. 

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत झालेल्या पावसामुळे शेती होत्याची नव्हती झाली. खरीप हंगामाला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. उशिरा पावसाच्या आगमनाने पेरण्याही उशिरा झाल्या. जिल्ह्यात तीन लाख चार हजार ८१० हेक्‍टरवर म्हणजेच ८६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृष्णा, कोयना नद्यांना महापूर आले. बहुतांश नद्यांनी पूर मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. तसेच अतिपावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. ऑगस्टपर्यंत कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांत २८ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. या झालेल्या नुकसानीची आजवर मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी स्वतःला सावरतोय, तोच ऑक्‍टोबर महिन्यात पिके काढणीला आली असतानाच मॉन्सूनोत्तर, तसेच वादळी पावसाने झोडपून काढले. या नुकसानीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. पहिले पंचनामे पूर्ण होताच आता दुसऱ्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामकाज सुरू झाले आहे.

सरासरी चार गावांसाठी एक कृषी सहायक कार्यरत आहे. प्रत्येक गावात शेकडो एकर जमिनी असून, बहुतांश शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणे, शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणे या कामांसाठी ते कसे पुरणार? निवडणुकीच्या कामासाठी सर्वच प्रशासन दावणीला बांधले जाते, मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का प्रशासन झटून काम करत नाही, असा सवाल केला जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा शेती हाच आर्थिक आधार असतो. आधीच त्याला फटका बसलेला आहे. अनेकांचे सोयाबीन, भुईमूग, भात आदी पिके वाया गेली. काहींनी सोयाबीन काळे पडले असतानाही कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागण्यासाठी निम्म्या दराने विक्री केली.

सततच्या पावसामुळे मशागतीची, भांगलणीची कामे करता आली नाहीत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा पीक काढणीचा खर्च जादा झाला. अनेक शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी करण्यासाठी नुकसान झालेली पिके काढली आहेत. अतिपावसामुळे काहींच्या शेतात पिकेच राहिली नाहीत. त्यामुळे पिकेच नाही, तर पंचनाम्यात दाखवू काय? अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात गुरुवारअखेर २८ हजार ६३७ हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे नजरअंदाज पाहणीत दिसून आले आहे. पंचनाम्याचे काम सुरू असून, नुकसानीच्या आकडेवारी वाढ होणार आहे.    महसूल, ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष  ऑगस्टमध्ये ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू होते. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्याने महसूल प्रशासन त्यात व्यस्त झाले. त्या वेळीही कृषी विभागाने पंचनामे करण्याचे काम केले. आता पुन्हा एकदा पंचनाम्यांचे काम सुरू असताना महसूल, ग्रामविकास विभागाकडून केवळ ‘फौजदारकी’चे कामकाज सुरू असल्याची टीका होताना दिसत आहे. त्यांचे कार्यालयातून कामकाज सुरू असल्याने शेतकऱ्यांत अन्याय होण्याची भीती आहे. 

‘सरसकट मदत द्या’ कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरणी झाल्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी सर्वच शेतांच्या बांधावर जातील, याला मर्यादा आहेत. शिवाय, सर्वच शेतकऱ्यांना स्वत: अर्ज करणे जमेल, असे नाही. तसेच वाया गेलेली पिकेही शेतातून काढली आहेत. अनेकांच्या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पेरणी आणि नुकसानीचे क्षेत्र यामध्ये मोठी तफावत होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी पुढे येत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com