शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्या

दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करताच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्या
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्या

पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करताच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्या रब्बी हंगाम सुरू असून, अनेक ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.   दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने दर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठा वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात शेतीसाठी एक आठवडा दिवस व एक आठवडा रात्री या वेळेत वीजपुरवठा केला जात होता. डिसेंबर महिन्याच्या नवीन वेळा पत्रकाप्रमाणे शेतीसाठी एका आठवड्यात सकाळी ७.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत व दुसऱ्या आठवड्यात रात्री ८.२५ ते पहाटे ६.२५ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा केला जाणार आहे.  राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्या बाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून, पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना रात्रीचे काम करावे लागत आहे. रात्री होणाऱ्या थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे.  सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योग धंद्याच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध केली जात आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच अडचणीत वाढ म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग वीजवितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. वीजवितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा बदल असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत, काबाडकष्ट करून शेतकऱ्यांना या बदलामुळे जागरण करावे लागत आहे.  प्रतिक्रिया.. औद्योगिक वसाहतीला २४ तास वीजपुरवठा केला जातो. शेतीसाठी ८ ते १० तास वीजपुरवठा केला जातो, तो पण रात्रीचा. सरकार आणि महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे. कोरोना काळात सर्व कारखाने बंद होते. पण या वाईट काळात जगाचा पोशिंदा मात्र जगाला जगवण्यासाठी धडपड करीत होता. त्यामुळे शेतकऱ्याचे जगणे मान्य करावे. बळीराजाच्या संजीवनीसाठी सरकारने व महावितरणने दिवसा ५ तास व रात्री ५ तास वीजपुरवठा करावा. - संदीप घोले, प्रगतशील शेतकरी, पाटस, दौंड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com