विमा कंपनीच्या नियुक्तीअभावी सहभागापासून शेतकरी वंचित

crop insurance
crop insurance

हिंगोली: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात पीकविमा योजना राबविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी विमा कंपनीकडून निविदा आल्या नाहीत. विमा कंपनीअभावी शेतकऱ्यांना पीकविमा प्रस्ताव सादर करता येत नाहीत. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. परंतु विमा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे यंदा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी रबी पीकविमा योजनेतील सहभागापासून वंचित राहण्याची शक्यता दिसत आहे. पर्यायी व्यवस्था करून पीकविमा प्रस्ताव स्वीकारावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांसाठी प्रतिकूल हवामान घटक, पेरणी ते काढणीपर्यंतची उत्पादनातील घट, काढणीपश्चात झालेले नुकसान, गारपीट, भूस्खलन, आग, ढगफुटी, विजा कोसळल्यामुळे झालेली पीकहानी आदी बाबींसाठी पीकविमा संरक्षण घेता येते.  गतवर्षी (२०१८) च्या रबी हंगामात पीकविमा योजना राबविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी बजाज अलायंझ कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्या वेळी गहू, ज्वारी, हरभरा, करडई या रबी पिकांसोबत उन्हाळी हंगामातील भुईमूग या पिकांचा या योजनेत समावेश होता. गतवर्षी जिल्ह्यातील ७७ हजार १५६ शेतकऱ्यांनी ५२ हजार १ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी १३ कोटी ४२ लाख रुपये विमा हप्ता भरला होता. गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात घट आल्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १५ हजार ९०० शेतकऱ्यांना ३ कोटी ३३ लाख रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला होता, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी सांगितले. यंदाच्या रबी हंगामात राज्यातील १७ जिल्ह्यांत रब्बी पीकविमा योजना राबविण्यासाठी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हिंगोलीसह १० जिल्ह्यांसाठी निविदा प्राप्त न झाल्यामुळे कंपनीची नियुक्ती करण्यात आली नाही. या जिल्ह्यांत पीकविमा योजना राबविण्यासाठी स्वतंत्र कार्यवाही केली जाईल, असे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. परंतु पीकविमा प्रस्ताव स्वीकारण्याच्या दृष्टीने अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे जिल्ह्यातील रबी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतकरी पीकविमा संरक्षण घेऊ इच्छीत आहेत. रब्बी हंगामातील पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मंगळवार (ता.३१) पर्यंतची अंतिम मुदत आहे. परंतु, हिंगोली जिल्ह्यात पीकविमा योजनेतील शेतकरी सहभागासाठी अंमलबजावणी केली जात नसल्याने यंदा रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेता येत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तत्काळ पीकविमा प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करावी. प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com