नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही कंपन्यांकडून विमा भरलेल्या लाभापासून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी वंचित ठेवले आहे. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करावी आणि विम्यापासून वर्षभर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने विम्याचा लाभ देण्याबाबत विमा कंपन्यांना सूचित करावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी खरिपात अति पाऊस व इतर नैसर्गिक कारणामुळे शेतपिकांचे सातत्याने नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही जोरदार पडल्याचा शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला. नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने शेतपिकाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होत शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरला. नगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकरी या योजनेत सहभागी झाले. मात्र नुकसान होऊनही पीकविमा कंपन्यांनी अजून, नगरसह अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिला नाही. नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही शेतकऱ्यांना विम्याच्या लाभाबाबत वस्तुस्थिती सांगितली जात नाही. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. कोरोनासह अनेक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असून, सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र यंदाच्या खरीप हंगामातील महिनाभराचा कालावधी गेला असला तरी अजूनही गतवर्षीच्या पीकविमा योजनेचा लाभ देण्याबाबत विमा कंपन्या काहीही बोलत नाही. शेतकरी त्रस्त आहेत.``
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.