चाळीसगाव, जि. जळगाव : अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या नुकसानीचे पंचनामे झाले. परंतु मोजक्याच गावांमधील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळाला आहे. अनेक गावांमधील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. या संदर्भात येथील शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून, हेक्टरी २५ हजारांची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
शेतकरी कृती समितीचे विवेक रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना शेतकरी प्रश्नी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, अतिपावसाचा पिकांना मोठा फटका बसला. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी केली होती.
शेतकऱ्यांमध्ये भेदभाव न करता, ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांच्या तिप्पट मदत केली गेली. त्याप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही बहुतांश शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले गेले आहे. ठरावीकच गावांना फळबागेची नुकसानभरपाई मिळाली आहे. ती सर्व फळबागायतदार शेतकऱ्यांनाही तत्काळ मिळाली पाहिजे. शेतीशी निगडित मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ करावे, दोन लाखांची अट काढून संपूर्ण कर्ज माफ करावे, रेग्युलर कर्जधारक शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनात रणदिवे यांच्यासह पुंजाराम पाटील, तुकाराम पाटील, कोकीळाबाई पाटील, प्रताप पाटील, धर्मा पाटील, उषाबाई पाटील, रूषाबाई पाटील, मधुकर पाटील, सुभाष पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.