दिवाळी प्रकाशाचा सण, मग आम्ही अंधारात कसे राहणार?

यंदा सोयाबीन गमावल्यानंतरही दिवाळी कुटुंबाला आनंद देण्यासाठी पूर्वीच्या उत्साहात साजरी करणार असल्याचे अल्पभूधारक शेतकरी संजय दिनकर राऊत यांनी सांगितले.
भोजला (ता. पुसद, जि. यवतमाळ) : घरासमोर कुटुंबीयांसमवेत शेतकरी संजय राऊत.
भोजला (ता. पुसद, जि. यवतमाळ) : घरासमोर कुटुंबीयांसमवेत शेतकरी संजय राऊत.

आरेगाव, जि. यवतमाळ : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात मग आम्ही शेतकऱ्यानं हा आनंद का साजरा करू नये? नैसर्गिक संकट तर येत-जात राहतात. त्याशिवाय आमचं जगणंच नाही. म्हणून येणारे सणसोहळे साजरे करूच नये का, असा सवाल भोजला (ता. पुसद) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय दिनकर राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे यंदा सोयाबीन गमावल्यानंतरही दिवाळी कुटुंबाला आनंद देण्यासाठी पूर्वीच्या उत्साहात साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळची ओळख शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून असली, तरी येथील शेतकरी पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग करत असतात. नैसर्गिक प्रकोपांना सातत्याने या जिल्ह्यास सामोरे जावे लागते, 

 कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, मध्येच रोग-किडींचा हल्ला आदी कारणांनी शेतकऱ्यांसमोरील आव्हान कायम असते. यंदाही शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकटांनी पिच्छा पुरविला आहे. पुसद तालुक्यातील भोजला शिवारात संततधार पावसामुळे सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले. उत्पादकता आणि उत्पन्नही प्रभावित झाले. मात्र त्यानंतरही गावातील शेतकऱ्यांनी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. संकट तर आमच्या जीवनाचा भागच झाला आहे. म्हणून का जगणं अन्‌ त्यातील आनंद सोडायचा, अशी प्रतिक्रिया गावातील बहुतांशी शेतकऱ्यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली. 

गावातील श्री. राऊत हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी अशा चौघांचा समावेश आहे. तीन एकर कोरडवाहू शेती असलेले संजय राऊत हे दगड, मातीच्या घरात राहतात. घराला डागडुगीची गरज आहे. परंतु शेतीच्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणाची तजवीज आणि दैनंदिन गरजा भागवाव्या लागत असल्याने घराच्या दुरुस्तीसाठी पैसा त्यांना यंदा जोडता आला नाही. हंगामात नुकसान झाले की मायबाय सरकार भल्या मोठ्या मदतीचा आव आणते अन् हाती थोडेफार पैसे पडतात. हे तर आमच्यासाठी असं ठरत की राजा उदार झाला अन् हाती भोपया देला. असं दर हंगामातच होत पण यंदा तर राजा आमच्या जिल्ह्यासाठी उदारही झाला नाई. जून ते ऑगस्ट मईन्यात पावसानं खंड दिला नाही म्हणून २५ टक्के मिळणाऱ्या विमा भरपाईतून आमचा जिल्हा वगळला. गेल्या दोन वर्षांत शिवार पिकलं नाई म्हणून कर्जाची परतफेड करता आली नाही. हे कर्ज आता दोन लाखावर पोचलं आहे. यंदा तीन एकरांत पेरलेल्या सोयाबीनपासून पाच पोते उत्पादकता झाली. लागवडीचा खर्च झाला २७ हजार रुपये त्याची भरपाई पण हे पाच पोते इकून होणार नाई. थकीत दोन लाखाच्या कर्जाचा बोजा अंगावर तसाच आहे, हे संकट का यंदाचंच हाये का? दर हंगामातच हे भोग आमाले भोगावे लागतात. शेतकऱ्याचा जनमच त्यासाठी झाला आहे. म्हणून का जगणं सोडायचं का? आमच्यासाठी दिवाळीच महत्त्व आहे, चिल्ल्यापाल्यांच्या आनंदासाठी तर सण साजरा करावा लागतेच ! नवे कपडे, गोडधोड, फटाके हे लेकरासाठी आणणारचं आहे. दिवाळी प्रकाशाचा सण मग आम्ही अंधारात कसे राहणार !

प्रकाशपर्व साजरे करू... गावातीलच पंडित ठाकरे यांनी देखील पाच एकरावर सोयाबीन लागवड केली होती. अवघे पंधरा पोतेच उत्पादन झाले. बाजारात भावही गडगडले. अशी संकट तर येतच राहतात. म्हणून का कुटुंबाच्या आनंदासाठी सण साजरा करायचा नाही का असे ते सांगतात. उमेश चौधरी यांना अडीच एकरातून आठ पोते तर रमेश भोसले या दोन एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला केवळ सात पोती सोयाबीन झाले. सात एकर जमीन असलेल्या विनोद ठाकरे यांना तीन पोत्यांचा उतारा आला. परंतु त्यानंतरही खचून न जाता उमेद कायम ठेवत प्रकाशपर्व साजरे करू असा निर्धार भोजला गावातील या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com