दक्षिण महाराष्ट्रात आले उसाला तुरे

दक्षिण महाराष्ट्रात उसाला तुरे येण्यास सुरवात झाली आहे. ८६०३२, को २६५ या जातींना तुलनेने प्रमाण कमी आहे. इतर जातींत वेगाने तुरे येत आहे. थंडीमुळे यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. तुरा आल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीपर्यंत ऊस कारखान्याला जाणे अपेक्षित असते. यामुळे तुरा आलेला ऊस कधी कारखान्याला जातो यावरच या उसाचे किती नुकसान होईल याचा अंदाज व्यक्त होऊ शकतो. सध्या पूरबाधित ऊस असल्याने त्याला वाडेही फारसे नाही. यामुळे आलेला तुरा ओळखणेही कठीण बनले आहे. - डॉ. आर.आर. हसुरे, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर.
ऊसाला आलेले तुरे
ऊसाला आलेले तुरे

कोल्हापूर  : महापूर व अतिवृष्टीच्या तडाख्यात अडकेल्या दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे शेतात बरेच दिवस पाणी साचून राहिले. परिणामी, नत्राची कमतरता भासत असल्याने उसाला तुरे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप हंगाम सुरू नाही आणि त्यातच उसाला तुरे येत असल्याने आता हा ऊस तातडीने गाळप करण्याचे आव्हान कारखाना व उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. 

तुरा आलेला ऊस जास्त दिवस शिवारात राहिल्यास नुकसानीत भरच पडण्याची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सुमारे वीस टक्के ऊस तुऱ्यात लपेटला आहे. यंदा ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिले. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हप्ते वेळेवर देता आलेले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील बरेचसे नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले. याचा फटका उसाच्या वाढीवर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते. तथापि, तुरा आल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी झाली नाही, तर काही जातीमध्ये उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे, अशा प्रकारचे नुकसान होते. यामुळे तुरा आलेल्या उसाची तातडीने तोड होणे गरजेचे आहे.  अद्याप कारखाने सुरू झाले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पूरबाधित ऊस पहिल्यांदा तोडण्याचा आग्रह केला आहे. यातच जो ऊस पूरबाधित नाही, पण अतिवृष्टीमुळे ज्या उसाला तुरे आले आहेत. तो ऊसही लवकर नेणे गरजेचे आहे.

कारखाना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पहिल्यांदा कोणता ऊस तोडायचा याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पूरबाधित ऊस तोडण्याबरोबरच तुरा आलेला ऊसही तुटणे गरजेचे आहे. पूरबाधित व अतिवृष्टीत अडकून खराब होत असलेल्या दोन्ही प्रकारच्या उसाला वाडे नसल्याने मजूरही तोडण्यास टाळाटाळ करण्याची शक्‍यता आहे. या उसाची तोड करणे आव्हान ठरत असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले.

सध्या आमच्या उसाला तुरे आल्याने त्याची तातडीने तोड होणे गरजेचे आहे. कारखान्यांनी हा ऊस प्राधान्याने गाळपास न्यावा, अशी आमची मागणी असल्याचे ऊस उत्पादक रमेश जाधव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com