नवा संत्रा प्रक्रिया प्रकल्प पळविला जाण्याची भीती 

विदर्भात नव्या हायटेक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. मात्र हा प्रकल्प पूर्ण होईल किंवा नाही, अशी अनामिक भीती देखील शेतकऱ्यांमध्ये आहे.
nagpur orange
nagpur orange

अमरावती ः विदर्भात नव्या हायटेक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. मात्र हा प्रकल्प पूर्ण होईल किंवा नाही, अशी अनामिक भीती देखील शेतकऱ्यांमध्ये आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यासाठी संत्रा प्रक्रिया उद्योगाची घोषणा झाली होती. मात्र हा प्रकल्प अशोक चव्हाण यांनी नांदेडला नेला होता. त्यामुळे या वेळी देखील वजनदार नेत्यांकडून आपल्या हक्‍काचा प्रकल्प पळविला जातो की काय, या शक्‍यतेने संत्रा उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.  दीड लाख हेक्‍टर लागवडीच्या माध्यमातून भौगोलिक मानांकन प्राप्त असलेला नागपुरी संत्रा विदर्भाचे मुख्य फळपीक झाला आहे. असे असताना गुणवत्ता सुधार, प्रक्रियेसाठी लागणारे वाण विकसित करण्यात संशोधन संस्था अपयशी ठरल्या. एकूण उत्पादनाच्या ४० टक्‍के संत्रा लहान आकाराचा (टुल्ली) राहतो. प्रक्रियेकामी याचा वापर झाल्यास चांगले दर मिळू शकतात. परंतु प्रक्रिया उद्योगच नसल्याने ही फळे फेकण्याशिवाय पर्याय राहत नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने वरुड-मोर्शी मतदारसंघात हायटेक संत्रा प्रक्रिया उद्योगाला मान्यता मिळाली. परंतु हा प्रकल्प आकारास येतो किंवा नाही या भीतीने या भागातील उत्पादकांना पिछाडले आहे. त्यामागे कारणेही तशीच आहेत.  वरुड तालुक्‍यात १९५७ मध्ये अमरावती जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शेंदूरजनाघाट यांनी ज्यूस प्रकल्प उभारला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ नोव्हेंबर १९५७ मध्ये या प्रकल्पाचे कोनशिला रोवली. सहकारी तत्त्वावरील या प्रकल्पातून देशाच्या मुख्य शहरात ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. परंतु राजाश्रयाअभावी अवघ्या पाच वर्षांतच हा प्रकल्प अवसायनात गेला आणि जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतला. १९९२ मध्ये सोपॅक या खासगी कंपनीने प्रकल्प उभारला. तो देखील बंद पडला.  तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी मोर्शी तालुक्‍यातील मायवाडी येथे ग्रेडिंग, कोटिंग प्रकल्पाची उभारणी केली. पहिल्या टप्प्यातील हा प्रकल्प देखील बरीच वर्ष बंद होता. आता महाऑरेंजच्या माध्यमातून तो चालविला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील इतरही खासगी आणि प्रस्तावीत प्रकल्पांना निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे ते देखील पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यासोबतच नागपुरातील रामदेबाब यांचा फूड प्रोसेसिंग प्रकल्प देखील गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे संत्रा प्रकल्पांची घोषणा ही या भागातील शेतकऱ्यांसाठी ‘नेमेची येतो पावसाळा’ या पठडीतील ठरत असल्याने त्याविषयीची उत्सुकता मात्र आता उरली नाही हे देखील तितकेच खरे आहे.  प्रतिक्रिया हा प्रकल्प अर्थसंकल्पात मंजूर व्हावा याकरिता सर्व बागायतदार आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठीशी राहिले. तो पूर्णत्वास जावा याकरिता पाठपुरावा करणेच आपल्या हातात आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी हिवरखेड भागात एका मोठ्या कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्याकरिता या भागातील परंपरागत संत्रा चालणार नाही. नवीन रोपांची खरेदी व त्याचे संवर्धन करावे लागणार आहे. मग त्या प्रकल्पाचा नागपुरी संत्र्याच्या मुल्यवर्धनात उपयोग काय?  - हर्षवर्धन देशमुख, माजी कृषिमंत्री 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com