नवी दिल्ली : संपूर्ण कर्जमुक्ती व उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळण्याचा नारा देत देशभरातून आलेल्या बळिराजाने शुक्रवारी (ता.३०) राजधानी दिल्ली दणाणून सोडली. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रामलीला मैदान ते जंतर-मंतरपर्यंतचा परिसर भरून गेला. देशातील पंचवीस राज्यांतील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांचे लाखो शेतकरी हक्काचा हमीभाव व कर्जमुक्तीच्या घोषणा देत सहभागी झाले. शेतकरी संघटनांच्या नेत्यांबरोबरच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फारुक अब्दुल्ला, शरद यादव, सीताराम येचुरी आदींसह अन्य नेत्यांनीही केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. कर्जमुक्तीचे खासगी विधेयक सरकारने मंजूर करेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. दरम्यान, संसदेला घेराव घालण्याची परवानगी सरकारने नाकारली, यामुळे मोर्चा जंतर-मंतरवर रोखला गेला. तिथेच सभा झाली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दोन दिवस आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी (ता.३०) सकाळी शेतकरी रामलीला मैदानात एकत्रित आले. त्यानंतर रामलीला मैदानातून मोर्चाला सुरवात करून मोर्चा टालस्टाय मार्गावरून सुमारे पाच किलोमीटर रॅली काढून संसद भवन मार्गावर आली. रॅलीमध्ये वेगवेगळ्या राज्यांतील शेतकरी, अादिवासी, शेतमजूर वेगवेगळे झेंडे हातात घेऊन सामील झाली होते. ‘किसान एकता जिंदाबाद’, ‘अपने हक्कं के लिय हल्ला बोल’, ‘देश लुटना बंद करो’ अशा केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणा शेतकरी देत होते. शेतकऱ्यांच्या मोर्चाने दणाणली दिल्ली (video) राहुल गांधी म्हणाले, ‘‘भारतातील प्रामाणिक शेतकऱ्यांना जगण्यासाठी कर्जे माफ केली जात नाहीत. मात्र भारतात सरकार कर्जबुडविण्यांना कर्जात सूट केली जाते. श्रीमंतांना साडेतीन लाख कोटींची कर्ज माफ केली जातात, मग शेतकऱ्यांची का नाही. देशाचे पतप्रंधान मोदी देशातील विकासाच्या गप्पा मारत आहेत. मग शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का येत आहे.’’ श्री. पवार म्हणाले, की भाजप सरकार शेतकरीहिताचे एकही धोरण राबवित नाही. आम्ही सत्तेत असताना शेतकारीहितासाठी सत्तर हजार कोटींची कर्जे माफ केली होती. शेतकरीहिताचे अनेक निर्णय आमच्या काळात घेतले होते. भाजप सरकारमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांची प्रगती व्हायची असेल तर भाजप सरकारला उलथवून टाकावे लागेल, यासाठी आपण सर्व संघटना व पक्ष एकत्र येण्याची गरज आहे. श्री. केजरीवाल म्हणाले, ‘‘सरकारला दिलेल्या अश्वासनांचा विसर पडला आहे २०१४ मध्ये निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व कर्जे माफ करणार व शेतीच्या मालाला हमीभाव देणार, अशी अाश्वासाने दिली होती. हीच मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पंतप्रधानांसह भाजपच्या नेत्यांना वेळ नाही. यांची सत्ता आता घालविण्याची वेळ आली आहे.’’ किसान मोर्चात देशभरातील शेतकरी सहभागी... (video) अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे समन्वयक आणि स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीत एकत्रित आला आहे. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की संपूर्ण कर्जमाफी व शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळायला हवा.’’ राष्ट्रीय किसान संघटनेचे व माजी मंत्री व्ही. एम. सिंग आदींसह देशभरातील प्रमुख नेत्यांची या वेळी भाषणे झाली. `किसान मार्च'ने केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या...
शेतकरी संघटनांची एकी या आंदोलनासाठी स्वाभिमानीचेे खासदार राजू शेट्टी, व्ही. एम. सिंग आदींसह अजित नवले आदींनी या आंदोलनाची मोट बांधली. याचे कौतुक देश पातळीवरील नेत्यांनी केले. सर्व संघटनांच्या मागणीचा पाठपुरावा राजकीय पक्षांतर्फे करण्याचे आश्वासन या वेळी सर्व पक्षांनी शेतकरी नेत्यांना दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.