night life
night life

शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ..!

पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न बिकट आहेत. शेती आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. विनासूचना वीज बंद, कधीतरी येते अन् वारंवार जाते ती वीज. आठवडाभर दिवसा चक्क चार तास, तर काही ठिकाणी आठ तास वीज गुल... अशातच रात्रीची वीज असताना नाइलाजाने शेतकऱ्यांना शेत ओलित करावे लागते, अंधारात सापविंचावांपासून ते आता बिबट्या, लांडग्यांची दहशत. या जगण्याची ओढाताण कधी संपेल, हेच कळेना... शेतकऱ्यांची ही आहे बोलकी व्यथा. राज्य सरकारने मौजमजेसाठी मुंबईत ‘नाइट लाइफ’ला परवानगी दिली आहे. परंतु ग्रामिण भागात शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे विजेअभावी ‘नाइट लाइफ’ सुरु आहे, त्याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. बेलोरा येथील ६२ वर्षीय शेतकरी शहाजी घोलप यांच्या शेतात दोन एकर गहू, दोन एकर हरभरा असून, त्यांनी आता उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. पाण्याची उपलब्धता आहे. पण दिवसा वीज मिळत नसल्याने ते आपल्या मुलांसह रात्री साडेआठ वाजता शेती पिकात तुषार संच सुरू करतात. त्यांची ‘नाइट लाइफ’ दिवस उजाडण्यापर्यंत संपता संपत नाही. अशावेळी घर मालकिणीच्या डोळ्यात चिंता साठलेली असते. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची ‘नाइट लाइफ’ वेगळीच आहे. शासन-प्रशासनाला शेतकऱ्यांच्या नाइट लाइफबद्दल मुळी चिंताच नाही. ग्रामीण भागात दिवसा लाइट, अर्थात वीज नसल्याने पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्रपाळी नाइलाजाने सुरू ठेवावी लागते.  अंधारात साप- विंचवाची भीती, बिबट्या, लांडगे आदी वन्य हिंस्र प्राण्यांची दहशत, अशातच अंधारात असुरक्षित वीज कनेक्शनमुळेही ‘नाइट- लाइफ’ केव्हाही जिवावर बेतणारे. परंतु पीक जगविण्यासाठीचे हे धाडस बळिराजाला करावेच लागते.   पुसद तालुक्यातील बेलोरा शेतशिवारात दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रभर शेतकरी सिंचनासाठी शेतात सतत कष्ट वेचत असतो. या परिसरात गहू, हरभरा, हळद अशी पिके शेतकरी घेत आहेत. विहिरी, तलाव, बंधारे हे जलस्रोत यंदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत असतानाच वीज वितरण कंपनीने मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचा वादा केला असला, तरी प्रत्यक्षात दिवसा आठ-आठ तास वीज गुल राहते. त्यामुळे दिवसभर सिंचन करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत नाइलाजाने शेतकऱ्यांना रात्रपाळीत सिंचन करावे लागते. रात्रीच्या अंधारात जिवावर उदार होऊन शेतकरी रात्रीचा दिवस करतात व पीक काढतात. अर्थातच या ‘नाइट लाइफ’मुळे शेतकऱ्यांची झोप होत नाही. डोळ्यात झोप घेत दिवस पाळीत मशागतीची कामे संपत नाही. ओघानेच शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. घर-मनाचे स्वास्थ्य खालावत आहे. शेतकऱ्यांच्या ‘नाइट लाइफ’चा अनुभव घ्यायचा असेल तर मंत्री, खासदार, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी यांनीही  बेलोरात यावे, अशी शहाजी घोलप व त्यांच्या शेतकरी मित्रांची विनवणी आहे. अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही दिवसा वीज मिळत नाही, त्याविषयी विचारणा केली असता कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. बरेचदा वीज रोहित्र अधिक दाबामुळे नादुरुस्त होते. ती बदलण्यासाठी किमान ८ दिवस लागतात. अशावेळी पिकांची वाढ थांबते व त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो. तक्रार करून उपयोग होत नाही. फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com