आर्णी, जि. यवतमाळ ः सायबर कॅफे संचालकाने पीकविम्याच्या बनावट पावत्यांच्या आधारे शेतकऱ्यांची फसवणूक केली. ११ लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली.
आर्णी तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात पीकविमा काढला होता. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी श्रीगणेशा सायबर कॅफेतून या संबंधीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. त्याकरिता विमा हप्त्याचा रीतसर भरणा केला गेला. त्याकरिता सायबर कॅफे संचालकाने त्यांना पावती दिली. परंतु, चौकशीअंती ती पावती बनावट असल्याचा खुलासा झाला.
या हंगामात अवकाळी आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यापोटी विमाभरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक झाल्याने त्यांना विमाभरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. आर्णी तालुका कृषी अधिकारी रमेश पसरवाड यांनी केलेल्या चौकशीत ६४९ शेतकऱ्यांची साडेअकरा लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर सायबर कॅफे संचालक श्रीकांत काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तात्काळ कार्यवाहीचे आदेश प्रशासनाकडून केवळ पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर विमा रक्कम व भरपाईसंबंधी काहीच हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायासाठी आमदार कडू यांची भेट घेतली. अमरावती येथील या भेटीत त्यांना या प्रकरणात मदत करण्याची मागणी केली. आमदार कडू यांनी तत्काळ आर्णी तहसीलदार धीरज स्थूल यांच्याशी संपर्क साधत कार्यवाहीचे आदेश दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.