किसानपुत्रांचे आज अन्नदात्यासाठी ‘अन्नत्याग आंदोलन’

किसानपुत्रांचे आज अन्नदात्यासाठी ‘अन्नत्याग आंदोलन’
किसानपुत्रांचे आज अन्नदात्यासाठी ‘अन्नत्याग आंदोलन’

पुणे ः शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ गुरुवारी (आज) केले जाणार आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली. 

अन्नत्याग आंदोलन राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे; तसेच देशात व विदेशांतही अनेक किसानपुत्र अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता गंजपेठेतील फुले वाड्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होईल. त्यानंतर १० ते ५ या वेळेत बालगंधर्वच्यासमोर येऊन थांबणार आहेत. या वेळी मयूर बागुल, नितीन राठोड, अनंत देशपांडे, डॉ. राजीव बसरगेकर उपस्थित राहणार आहेत. 

अन्नदात्यासाठी अन्नत्याग करताना किसानपुत्र आंदोलनातील कार्यकर्ते सामूहिकरीत्या करण्याऐवजी तो वैयक्तिक पातळीवर करावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते श्री. हबीब यांनी केले आहे; तसेच शेतकऱ्यांप्रती बांधिलकीला बळ द्यावे, समाजामध्ये जागृती व्हावी, सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, व्यक्तिगत शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी बळकट व्हावी, या हेतूने अन्नत्याग केले जात आहे. 

१९ मार्च १९८६ रोजी चिल-गव्हाण (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांची पत्नी मालतीताई व चार अपत्यांसह आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्यांची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. आजपर्यंत सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. साहेबराव करपे यांच्या ३४व्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन केले जाणार आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाचे यंदा हे चौथे वर्ष आहे, असे श्री. हबीब यांनी सांगितले.

अमर हबीब म्हणाले की, संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या निमित्ताने जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणास्तव सार्वजनिक उपवास करण्याऐवजी वैयक्तिक उपवास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे नागरिक या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यांनी अन्नत्याग केल्याबाबतचे निवेदन फोटोसह समाज माध्यमावर प्रसिद्ध करावे, अशी सूचनाही करण्यात आली. 

किसानपुत्र आंदोलनातर्फे आवाहन

  • अन्नत्याग करताना आंदोलकांनी वैयक्तिक उपवासाचे आवाहन करावे. 
  • या आवाहनात, एकत्र बसून यंदा उपोषण का करू शकत नाही, हेही सांगावे.
  • वैयक्तिक उपवास करणाऱ्यांनी आपल्या घराच्या गेटवर गुरुवारी (ता. १९) ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’  असे लिहिलेले फलक लावावेत. 
  • या फलकासोबत पूर्ण कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर टाकावा. मात्र, सायंकाळी सांगता समारंभाचे कार्यक्रम टाळावेत.
  • उपवास हा आपला मुख्य कार्यक्रम आहे. वैयक्तिक बांधीलकीला महत्त्व आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी वैयक्तिक उपवास करून या अभियानात सहभागी व्हावे.  - मयूर बागुल, समन्वय, किसानपुत्र आंदोलन समिती

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com