‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी धडपड

पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टाकलेल्या मोटारी.
पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टाकलेल्या मोटारी.

भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका उजनी धरणाकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे. धरण शंभर टक्के भरूनही सध्या पाणीपातळी उणे २० टक्‍क्‍यांहूनही खाली गेल्यामुळे उजनीकाठच्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी लढाई सुरू झाली आहे. रोज पाणीसाठा खालावत असल्यामुळे सध्या शेतकरी उजनीकाठावरच तळ ठोकून असल्याचे चित्र भिगवणपासून ते पळसदेवपर्यंत पाहावयास मिळत आहे. 

चालू वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. धरणांमध्ये सुमारे ११७ टीएमसी पाणीसाठा झाला होता; परंतु एप्रिल महिन्यामध्ये धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. सध्या उजनी धरणांमध्ये उणे २० टक्‍क्‍यांहूनही कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली हजारो एकर क्षेत्रातील पिके अडचणीत आली आहेत. पाण्याअभावी जळून चाललेली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सध्या दौंड तालुक्‍यातील राजेगाव, खानोटा येथे पाणी काही दिवसांत संपण्याची चिन्हे आहेत; तर इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगाव, डाळज, पळसदेव येथे पाणी नदीपात्रात पोचले आहे.

सतत खाली जाणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रोजच पाइप वाढवावे लागत आहेत. विजेचा लपंडाव, खालावलेली पाणीपातळी, पाण्याअभावी करपणारी पिके व चिंताग्रस्त शेतकरी अशी अवस्था सध्या उजनीकाठच्या शेतकऱ्यांची आहे. आणखी एक महिना पिके कशी वाचवायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. केवळ शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दौंड, इंदापूर, करमाळा व कर्जत तालुक्‍यांतील पिके धोक्‍यात आली आहेत. ज्याप्रमाणे दुष्काळी भागातील पिकांचे पंचनामे केले जातात त्याचप्रमाणे नदीकाठच्या पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांचेही पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.

याबाबत बळिराजा शेतकरी संघाचे प्रदेश संघटक अनिल खोत म्हणाले, की उजनी धरणासाठी इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी त्यांच्या सुपीक जमिनींचा त्याग केला आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी नऊ टीएमसी पाणी राखीव आहे. प्रकल्पातील पाणी देताना प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांचा विचार होण्याची आवश्‍यकता आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे इंदापूर तालुक्‍यातील हजारो एकरातील पिके धोक्‍यात आली आहेत. हा शासननिर्मित दुष्काळ असून, शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सरकारने नुकसानभरपाई द्यावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com