कऱ्हाड : शेतकरी वाटताहेत फुकट पपई 

शासनाकडून फळबागेकडे वळा, असे सांगितले जात आहे. त्यातून शेतकरी पपईसारखी फळपीक घेऊ लागला आहे. मात्र बाजारपेठेत पपईची आवक वाढल्याने पपईला दोन रुपये किलो दर मिळत आहे.
Farmers think free papaya
Farmers think free papaya

कऱ्हाड, जि. सातारा : शासनाकडून फळबागेकडे वळा, असे सांगितले जात आहे. त्यातून शेतकरी पपईसारखी फळपीक घेऊ लागला आहे. मात्र बाजारपेठेत पपईची आवक वाढल्याने पपईला दोन रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अनेक शेतकरी दर मिळत नसल्याने आणि पपईच्या तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यापासून फुकट वाटायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.  सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने उसाची शेती करतात. मात्र उसाचे पैसे शेतकऱ्यांना वर्षा-दीड वर्षानी मिळतात. त्या दरम्यानच्या काळात शेतातील काही भागात शेतकरी कमी कालावधीत उत्पादन मिळेल, अशी भाजीपाला, फळभाज्यासह फळांची शेती करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चार-पैसे मिळू लागले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा असे सांगितले जात आहे. त्यातून सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपईचे उत्पादन घेतले आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळाले. मात्र अलीकडे पपईची बाजारपेठेत आवक वाढली आहे, त्याचबरोबर इतर राज्यातून पपईला मागणी नसल्याने उठाव नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पपईला मिळणारा सात ते बारा रुपये किलोचा दर सध्या दोन रुपयांवर आला आहे. परिणामी, पिकासाठी घातलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज काढून पपईचे पीक घेतले आहे. त्यातच सध्या दर नसल्याने बळिराजासमोर कर्ज कसे भागवायचे हा मोठा प्रश्‍न आहे. पपई नाशवंत असल्याने पपई जास्तकाळ शेतात राहिली तर ते वाया जाणार आहे. तरीही दर नसल्याने शेतकऱ्यांनी पपईचा तोडाच दोन आठवड्यांपासून केला नाही. काही शेतकऱ्यांनी सध्या फुकट पपई वाटण्यास सुरुवात केली आहे. 

शासनाच्या हमीची आवश्यकता  शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांकडेही वळत आहे. मात्र त्यांना फळे आल्यावर किमान उत्पादन खर्च तरी निघावा एवढा दर मिळेल, याची खात्री शासनाने घेण्याची गरज आहे. ती न घेतल्याने अनेक पपई उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही शेतकरी कर्जबाजाराही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  प्रतिक्रिया 

शेतकरी कर्ज काढून, दिवसरात्र कष्ट करून स्वतःच्या हिंमतीवर फळपिके घेतो. आम्ही पपई घेतली आहे. मात्र त्याला शाश्‍वत दर नाही. सध्या दोन रुपये दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्च आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने आम्ही दोन आठवडे पपईचा तोडाच केला नाही. शेतातील पपई फुकट वाटत आहोत. 

-दिलीप पाटील, शेतकरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com