संकटकाळात टोल वसुली म्हणजे शेतकऱ्यांची लुटच : शेतकरी नेते आक्रमक

कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाचे एकतर प्रचंड नुकसान होत आहे. त्याच जे शेतकरी अशा काळात शेतमाल विक्रीचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून टोलवसुली केली जात आहे. ही वसुली म्हणजे संकटकाळी शेतकऱ्यांची लुटच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत
संकटकाळात टोल वसुली म्हणजे शेतकऱ्यांची लुटच : शेतकरी नेते आक्रमक
संकटकाळात टोल वसुली म्हणजे शेतकऱ्यांची लुटच : शेतकरी नेते आक्रमक

नगर : कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाचे एकतर प्रचंड नुकसान होत आहे. त्याच जे शेतकरी अशा काळात शेतमाल विक्रीचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून टोलवसुली केली जात आहे. ही वसुली म्हणजे संकटकाळी शेतकऱ्यांची लुटच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच या काळात शेतमाल वाहतुकीवरील टोल रद्द करावा अशी मागणी केली आहे.  लॉकडाऊनमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी  टोल वसूली करणे हे आर्थिक संकटात आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतमालावरील टोलवसुली सारख्या बाबी तातडीने बंद करण्याची मागणी राज्यातील शेतकरी नेत्यांनी केली आहे.  याविषयी बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, की कोरोनामुळे राज्यातला, देशातला शेतकरी नेहमीप्रमाणे अडचणीत आला आहे. लाखमोलाची फळे, भाजीपाला शेतात पडून आहे. विक्री करायचा प्रयत्न केला तर दर मिळत नाही. त्यात शहरात जायचे झाले तर टोल भरून वरचेवर खर्चात भर पडत आहे. टोलची रक्कम  शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. मुळात वाहन खरेदी करतानाच सर्व टॅक्स वसूल केले जात असताना टोल घेतलाच नाही पाहिजे. त्यात अशा संकटकाळी टोल घेण्याचा काहीही सबंध येत नाही. सध्या सुरू असलेली टोलवसुली तातडीने बंद केली पाहिजे. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, की शेतीमालाच्या वाहनांकडून टोलवसुली होणे म्हणजे एक प्रकारची हेळसांडच आहे. एकतर दर नाही, त्यात टोलवसुली सारख्या प्रकारातून खर्च वाढीस गेला तर शहरात माल जायचा बंद होईल. तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांकडून टोलवसुली करू नये अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहे.  अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, की लॉकडाऊनमुळे शेतीमाल वाहतूक व विक्री साखळी संपूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बाजार समित्यांची व्यवस्थाही प्रभावित झाली आहे. शेतीमालाची किंमत यामुळे कवडीमोल झाली झाली. शेतीमाल शेतातून शहरांपर्यंत नेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरकारने टोल वसुलीला दिलेली परवानगी अनाकलनीय अशीच आहे. किमान शेतीमाल व अत्यावश्यक सेवांसाठी टोल वसुली बंद करावी अशी मागणी किसान सभा करत आहे. केंद्र-राज्य सरकारांना पत्र लिहिणार : राजू शेट्टी सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा काळात मदतीचा हाथ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळांचे प्रचंड नुकसान होत आहे. विक्री करतानाही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशाही परिस्थिती शेतकरी शहरात जाऊन फळे, भाजीपाला, शेतमाल विक्री करण्याचा प्रयत्न करत असताना सरकार मात्र आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या वाहनांकडून टोलवसुली करत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. एकतर दर मिळत नाही, त्यात अशा कारणाने खर्च वाढत आहे. मुळात अशा काळात टोल वसुली करण्याचे काही कारण नाही. ही टोलवसुली तातडीने थांबावी यासाठी मी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com