सरकारच्या मदतीवर शेतकरी असमाधानी

शासनाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या मदतीचा निधी जिल्ह्यांना वळती केला जात आहे. अकोला जिल्ह्याच्या वाट्याला यात केवळ २६ कोटी, तर वाशीममध्ये अवघे साडेतीन कोटी मिळाले आहेत.
crop damage
crop damage

अकोला ः शासनाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या मदतीचा निधी जिल्ह्यांना वळती केला जात आहे. अकोला जिल्ह्याच्या वाट्याला यात केवळ २६ कोटी, तर वाशीममध्ये अवघे साडेतीन कोटी मिळाले आहेत. तर बुलडाणा जिल्ह्याला ४७ कोटी ८९ लाख रुपये प्राप्त झाले. यंदा कीड व पावसामुळे झालेल्या नुकसानाची ही भरपाई अत्यंत तोकडी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागल्‍या आहेत.   या वर्षात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मदतीची घोषणा केली होती. अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात अति पावसामुळे ५१ हजार ६४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने सादर केला होता. जिल्ह्यात परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात पीक काढणीच्या स्थितीत धुमाकूळ घातला. मात्र या काळात नुकसानीचे पंचनामे न झाल्याने जिल्ह्याचा अहवाल शून्य दाखविण्यात आला. यावर विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी प्रश्‍नही उपस्थित केले. त्याबाबत काहीही झाले नाही.  शासनाने आधीचाच अहवाल गृहीत धरीत २६ कोटी ९४ लाख रुपये मदत पाठविली. वास्तविक जिल्ह्यात या खरिपात मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी आणि कापूस या सर्वच महत्त्वाच्या पिकांची उत्पादकता जेमतेम आहे. मुगाचे १०० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. उडदाच्या पिकानेही फटका दिला. सोयाबीन एकरी क्विंटलपासून चार-पाच क्विंटलपर्यंत येत आहे. सोयाबीन संपूर्ण वाया गेले आणि कपाशीची बोंडे बोंड अळी व सडीने खराब झाले. अशी परिस्थिती असतानाही तुलनेने मदत कमी असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.  यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा जोर काही भागात अधिक राहिलेला आहे. अतिपावसामुळे सोयाबीनवर खोडकिडा वाढला होता. मूग, उडदापाठोपाठ ज्वारीच्या पिकाचेही नुकसान झालेले आहे. अतिप्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीची बोंडे काळवंडली होती. नुकसानीचा कृषी व महसूल यंत्रणांनी अहवाल तयार केला होता. यानुसार जून ते सप्टेंबर या काळातील नुकसान गृहीत धरण्यात आले. ऑक्टोबरमध्ये नुकसानाची दखल न घेतल्याने अकोला जिल्ह्याच्या वाट्याला पुरेशी मदत मिळू शकलेली नाही. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातही अशीच स्‍थिती आहे. या जिल्ह्यांच्या वाट्याला मिळालेली मदत कमी आहे. वाशीम जिल्ह्याला तर अवघे साडेतीन कोटी रुपये मिळाल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया यंदा पावसाने व किडींनी संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले. दिवाळी उंबऱ्यापर्यंत आली, तरी अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापसाचे बोंड नाही. काहींना एकरी एक क्विंटलपर्यंत कापूस झाला. मूग १०० टक्के नुकसान झाले. सोयाबीनही जेमतेम आलेले आहे. अशा स्थितीत शासनाने जी मदत केली ती पुरेशी नाही. ही तोकडी मदत शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही. - विलास ताथोड, शेतकरी संघटना, अकोला जिल्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com