परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजवर विविध बॅंकांकडून १ लाख ३८ हजार ८९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे ७४८ कोटी ९० लाख ५५ हजार ७५४ रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने सर्व १८ हजार ५७१ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली. परंतु, जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांचे मिळून एकूण १० हजार २५० शेतकरी कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते. शेतकऱ्यांचे अर्ज आणि बॅंकांकडील कर्जखात्याची सांगड घालून तयार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील १ लाख ४९ हजार १४९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ७५३ कोटी ८५ लाख ४ हजार ५९६ रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली होती.
यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ४२ हजार ११ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ४८ कोटी ६७ लाख २१ हजार ५११ रुपये, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ८८ हजार ५६७ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ५९४ कोटी ९२ लाख ३१ हजार ५२२ रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या १८ हजार ५७१ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ११० कोटी २५ लाख ५१ हजार ५६२ रुपये एवढ्या रकमेचा समावेश आहे.
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या कामात महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आघाडीवर आहे. या बॅंकेने सर्व १८ हजार ५७१ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ११० कोटी २५ लाख ५१ हजार ५६२ रुपये एवढी रक्कम जमा केली आहे. जिल्हा बॅंकेच्या ९ हजार ४१५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८८ लाख ६३ हजार ५८९ रुपये, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ८३५ शेतक-यांच्या खात्यावर ४ कोटी ५ लाख ८५ हजार २५२ असे दोन्ही बॅंकांच्या मिळून एकूण १० हजार २५० शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ कोटी ९४ लाख ४८ हजार८४१ एवढी रक्कम वर्ग करण्याचे काम शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.