जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना प्रतीक्षा उपाययोजनांची

सरकारने दुष्काळ जाहीर केला. केंद्राच्या समितीमार्फत तपासणी केली जाणार, असे सांगितले होते. मात्र अद्यापही समिती आलेली नाही. पाणी नाही, रब्बीची पेरणी केलेली नाही. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. आता सरकारने खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. तसेच जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत. - दिलीप पाटील, शेतकरी, हळ्ळी, ता. जत, जि सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या भीषण संकटात सापडले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. शासनाने या संदर्भात तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. सर्व जलस्रोत आटत चालले आहेत. टंचाईमुळे पाण्यासाठी लोकांची मोठी धावपळ होत आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने केलेल्या घोषणा अद्यापही हवेतच आहेत.

तालुक्यात चाराटंचाईमुळे पशुधन धोक्यात आले आहे. खरीप आणि रब्बी पिकांची आशा संपुष्टात आली आहे. थोड्याफार पाण्यावर जगवलेल्या द्राक्ष व डाळिंब बागाही संकटात आहेत. त्यामुळे जनतेत दिवाळीचाही उत्साह जाणवला नाही. दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवरदेखील दिसून येत आहे. परिणामी खरेदी व विक्रीदेखील थंडावली आहे.

खरीप आणि रब्बी हंगांम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार वाढत आहे. शासनाने सरसकट कर्जमाफी न करता गुंतागुंताची प्रक्रिया राबविली आहे. या कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था निर्माण  झाली आहे. सहा महिने झाली तरीही अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच आहे.

दोन्ही हंगाम व फळपीक विम्याची भरपाई तातडीने मिळणे गरजेचे होते. मात्र, अद्याप ती मिळालेली नाही. बोटावर मोजण्याइतक्या लाभार्थ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला आहे. दुष्काळी स्थिती असलेल्या तालुक्यांसाठी विविध उपाययोजना केवळ जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात कार्यवाहीला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. पीक नुकसानभरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

‘म्हैसाळ’चे पाणी सोडून दिलासा द्यावा जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. तालुक्यातील १६ सिंचन तलावात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप पाणी सोडलेले नाही. प्रतापपूर, वाळेखिंडी, कोसारी, बेळुंखी, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, शेगाव, कुडनूर, शिंगणापूर, अंकले, डोर्ली, हिवरे, सिंगणहळ्ळी, काशिलिंगवाडी  तसेच  यात समावेश नसलेल्या येळवी, सनमडी या तलावातही म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. दुष्काळी स्थिती पाहता त्वरित पाणी सोडण्याची आवश्यकता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com