मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस

मराठवाड्यात शेतकऱ्यांना पावसाची आस
मराठवाड्यात शेतकऱ्यांना पावसाची आस

औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी बरसलेला पूर्वमोसमी पाऊस वगळता मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी झालेल्या या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग दिला. शेतकऱ्यांनी बियाण्यांविषयीची विचारपूसही सुरू केली. परंतु ती औटघटकेचीच ठरली असून, शेतकऱ्यांना पावसाची आस आहे. 

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. तरीही दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चांगलीच परवड सुरू आहे. कर्जमाफी व नव्याने कर्ज मिळण्यातील अडचणी, पीकविमा परताव्याचा प्रश्‍न, पेरणीसाठी पैशांची चणचण, यामुळे शेतकरी पुरता हतबल आहे. गतववेळीच्या पावसाळ्यात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याच्या कृषी विभागात वार्षिक सरासरीच्या ५९ टक्‍केच पाऊस झाला. तीनही जिल्ह्यात ६३५ मिलिमीटर अपेक्षित असलेला पाऊस केवळ ३७३ मिलिमीटरच बरसला. त्यातही चार खंड पडले. या खंडांचा कालावधी हा २३ ते ७० दिवसांचा होता. त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेस मोठा फटका बसला. 

यंदाही अजून सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे लांबलेला हा पाऊस येतो कधी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमध्ये आहे. जूनअखेरीस, जुलैच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या चालण्याची शक्‍यता आहे. चारापाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. शेतीकामातून होणारी रोजगारनिर्मिती लांबत आहे. पेरणीपूर्वी खत, बियाणे उचलण्याची गतीही तूर्त मंदच आहे. 

मराठवाड्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस बऱ्यापैकी पडला. या भागात तुरळक कपाशी उत्पादकांनी लागवडीची घाई केली. परंतु आता तापणाऱ्या उन्हामुळे तुरळक ठिकाणी लागवड झालेल्या कपाशी उत्पादकांच्या नजरा आकाशाकडे आहेत. मराठवाड्यात पावसाची सरासरी ७७९ मिलिमीटर आहे. ७ ते १२ जुनदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने वार्षिक सरासरीच्या १.९ टक्‍केच पाऊस झाला. १२ जूनपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत सरासरी २५.९ टक्‍के पावसाची नोंद प्रशासनाने घेतली. 

पाऊस लांबल्यास पेरणी क्षेत्रास फटका

पाऊस आणखी लांबल्यास त्याचा थेट परिणाम मूग, उडदाच्या पेरणीवर होईल. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात मुगाची ६२ हजार, तर उडदाची ४७ हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत मूग, उडदाची पेरणी चालत असली, तरी या पिकांची पेरणी जूननंतर गेल्यास उत्पादकतेत घट येण्याची शक्‍यता आहे. शिवाय या पिकाचा कालावधी व त्यानंतर रब्बी पिकाची करावयाची पेरणी, यामध्येही अडथळा येईल. त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता निर्माण होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com