उसाच्या पहिल्या उचलीकडे साताऱ्यातील शेतकऱ्यांचे लक्ष

एफआरपी एकरकमी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिली उचल त्वरित द्यावी. पहिली उचल १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. त्यामुळे ऊस तुटून गेलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांवर गुन्हे नोंद करावेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच आंदोलन करणार आहे. - सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.
संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

सातारा ः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटून गेला, तरी एकाही कारखान्याने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. एकरकमी एफआरपी बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याप्रमाणे एकरकमी एफआरपीचा पॅटर्न सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने आणि प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत मान्य केला होता. जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. ऊस तुटून गेल्यावर पहिला हप्ता १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. मात्र, अनेक कारखान्यांचे गाळप एक महिन्यांपेक्षा अधिक काळ झाले आहे तरीही एकाही साखर कारखान्याने पहिला हप्ता जमा केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात ८२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. उसाच्या क्षेत्राबरोबर साखर कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने ऊस शिल्लक राहत नसल्याच्या अनुभव आहे. अनेक कारखान्यांनी गाळपासाठी कार्यक्षेत्रातील ऊसाला प्राधान्य दिले आहे. एकरकमी एफआरपी मिळणार, या आशेने शेतकऱ्यांची गतहंगामात जास्त साखरउतारा असलेल्या कारखान्यांना ऊस देण्यासाठी धडपड सुरू आहे.

बहुतांशी कारखान्यांचा गाळप सुरू होऊन महिन्यांपेक्षा जास्त कालवधी होऊन गेला असतानाही उसाची बिले आलेली नाही. यातच साखेरच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांसह शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. यामुळे पहिली उचल कधी व किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.  

प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. मात्र, सध्या साखरेचा दरात घसरण झाली आहे. सध्या २९३० ते २९४० रुपये प्रतिक्विंटल दर साखरेस मिळत आहे. बॅंकाकडून क्विंटलला दराच्या ८५ टक्के कर्ज दिले जाते. यामुळे एक रकमी देणे सध्या तरी शक्य होणार नसल्याचे बोलले जात आहे. जाहीर केलेल्या दरात कपात होणार असल्याने दर कमी मिळण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com