अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी जेरीस

जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. या संदर्भाने वारंवार निवेदन देऊनही वनविभागाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
अस्वलाकडून होणाऱ्या  नुकसानीमुळे शेतकरी जेरीस Farming from bears Damage
अस्वलाकडून होणाऱ्या  नुकसानीमुळे शेतकरी जेरीस Farming from bears Damage

भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. या संदर्भाने वारंवार निवेदन देऊनही वनविभागाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी सुमारे पाच लाखाचे नुकसान होत असताना ते हतबलपणे पाहण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नसल्याची खंत या शेतकऱ्याने पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली. 

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. हंगामात मोठ्या प्रमाणावर धान्य लागवड या भागात होते. मात्र काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत प्रयोगशीलतेच्या बळावर नगदी आणि व्यावसायिक पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. माडगी (केसलवाडा वाघ) येथील कवळू शांतलवार हे देखील अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक होत. कवडू शांतलवार यांनी १९९४ मध्ये दोन एकर क्षेत्रावर चिकूची १५० झाडे लावली. त्यासोबतच काही क्षेत्रावर त्यांनी सीताफळ आणि आंबा लागवड केली आहे. एप्रिल आणि मे असे दोन महिने चिकूचा हंगाम राहतो. मात्र वातावरणातील बदलामुळे आता मार्च महिन्यापासूनच चिकूचा हंगाम सुरू होतो, असे त्यांनी सांगितले. 

बागेतील दीडशे झाडांपासून त्यांना सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र २०१६ पासून चिकू बागेत दोन अस्वलांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यांच्याकडून हंगामात मोठ्या प्रमाणावर बागेतील फळांचा फडशा पाडला जातो. अस्वलाचा त्रास वाढीस लागल्याने त्यांनी बागेभोवती कुंपण देखील केले. मात्र अस्वल त्यानंतरही बागेत शिरून नुकसान करीत असल्याने ते हतबल झाले आहेत. 

वन्य प्राण्यांमुळे सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न अवघ्या दोन लाखांवर आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. हंगामात बागेत चिकू तोडण्यासाठी येणाऱ्या मजुरांमध्ये देखील या वन्यप्राण्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यांची ही शेती जंगलालगत आहे त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी वन विभागाकडे केली आहे. मात्र या दोन अस्वलांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप शेतकरी कवडू शांतलवार यांनी केला आहे. 

उलट जंगलानजीक आपण चिकू बाग लावून आमच्या वन्यप्राण्यांची सोय केली, असे उपरोधिक टोमणेदेखील वन विभागाचे काही अधिकारी मारत असल्याचे त्यांनी खिन्नपणे सांगितले. वनविभागाकडून वेळीच अस्वलांचा बंदोबस्त न झाल्यास चिकू बाग काढून टाकण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com