पुणे जिल्ह्यात शेततळे कोरडे; फळबागा धोक्यात 

माझ्याकडे ७० ते ७५ एकरांवर फळबाग आहे. पाण्यासाठी दहा विहिरी आहेत. या सर्व कोरड्या पडल्या आहेत. दुष्काळात फळबागांना पाणी देण्यासाठी तीन कोटी लिटरचे दोन शेततळे घेतले होते. सध्या शेततळ्यात टाकायला पाणी नसल्यामुळे अडचणी तयार झाल्या असून फळबागाही धोक्यात आल्या आहेत. - अतुल शिंगाडे, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळी घेतली आहेत. मात्र, गेल्या पाच ते सहा  महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. परिणामी, विहिरी कोरड्या पडल्याने या शेततळ्यांत साठवणुकीसाठी पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांहून अधिक शेततळी पाण्याअभावी कोरडे पडली असून, फळबागाही धोक्यात आल्या असल्याचे चित्र आहे.  

गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी तीव्र पाणीटंचाई होती. या काळात जिल्ह्यातील फळबागा जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. कृषी विभागापुढे या पाणीटंचाईच्या काळात फळबागांना जीवनदान देण्यासाठी तात्पुरत्या योग्य त्या उपाययोजना म्हणून शेततळ्याचा पर्याय समोर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या एनएमएच या अभियानाअंतर्गत शेततळेनिर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना दिली. कृषी विभागाकडे मागील सात ते आठ वर्षांत सुमारे पाच हजारांहून अधिक शेततळी शेतकऱ्यांनी घेतल्याची नोंद आहे. त्यासाठी कृषी विभागाने अनुदान म्हणून २० ते २५ कोटी रुपये खर्चही केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेततळ्यांचा आधार मिळाला.

मात्र, शेतकऱ्यांकडून शेततळ्यांची मागणी वाढत गेल्याने शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राबविण्यास सुरवात केली. त्यामुळे जिल्ह्यात सध्या सुमारे पाच हजारांपर्यंत शेततळी  आहेत.  गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे नोव्हेंबरपासून पाणीटंचाई सुरू झाली. त्याचा फटका खरिपासह, रब्बी पिकांनाही बसला आहे. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. याच भागात फळबागा व शेततळ्यांचे प्रमाण अधिक आहे. अनेक शेतकरी विहिरीतील पाणी उचलून शेततळ्यात टाकून टंचाईच्या काळात ठिबकद्वारे पाणी फळबागांना देतात. 

परंतु, सध्या भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेततळ्यात टाकायला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यातच कालव्याच्या पाण्याचीही शक्यता कमी झाली आहे.     माझ्याकडे एकूण ५० एकर शेती आहे. यामध्ये २५ एकरांवर विविध प्रकारच्या फळबागा आहेत. शेतीला पाणी देण्यासाठी २००७ मध्ये सव्वा कोटी लिटरचे शेततळे घेतले होते. गेल्या नोव्हेबर, डिसेंबरमध्ये पाणी नसल्याने विकतचे पाणी घेऊन शेततळ्यात टाकले होते. त्यानंतर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी पाइपलाइनद्वारे उचलून शेततळ्यात टाकले आहे. सध्या दीड ते दोन महिने पुरेल एवढे पाणी असले तरी त्यानंतर पाणी उपलब्ध न झाल्यास शेततळे कोरडे राहणार आहे, असे खैरेनगर (ता. शिरुर) येथील  रघुनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सुमारे पाच हजारांहून अधिक क्षेत्रावर फळबागा आहेत. या फळबागा जगविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेततळे घेतले आहे. मात्र, पाणी टंचाईमुळे शेततळ्यात टाकायला पाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेततळे कोरडे पडू लागले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी   बी. जे. पलघडमल यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com