रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे ४० टक्के नुकसान

नवरात्रात अर्धे भातपीक कापले होते; मात्र ते झोडण्याच्या आत परत पाऊस सुरू झाला. अजून शेतात ३० टक्के भातपीक शिल्लक आहे. मात्र त्याचा काही उपयोग होईल, असे वाटत नाहीत. - संजय शिगवण, शेतकरी, संगमेश्‍वर
पावसामुळे भात शेतीचे झालेले नुकसान
पावसामुळे भात शेतीचे झालेले नुकसान

रत्नागिरी  ः अरबी समुद्रातील ‘क्यार’ चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा जिल्ह्याला बसला आहे. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्या‍मुळे समुद्र खवळला असून, अजस्र लाटांनी किनारे उद्‍ध्वस्त झाले आहेत. मासेमारी ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. या स्थितीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला असून, जिल्ह्यात सुमारे ३० ते ४० टक्के क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. मात्र, अद्यापही कृषी विभागाकडून प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

शुक्रवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील मंडणगड येथे सरासरी ९, दापोली येथे १०, खेड येथे २०, गुहागर येथे ४५, चिपळूण येथे ८, संगमेश्‍वर येथे १४, रत्नागिरी येथे १९, लांजा येथे २६, राजापूर येथे २० मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे कापणीयोग्य भातशेती आडवी झाली आहे. गेले आठवडाभर पावसाचा कहर सुरूच आहे. बदलत्या हवामानामुळे भातावर लष्करी अळीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. भात जमिनीवर पडून राहिल्याने तयार लोंब्यांना नव्याने कोंब फुटले आहेत. मंडणगड तालुक्यातील तुळशी, अडखळ, वेरळ तर्फे नातू, पाले या गावांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील वेरळ तर्फे नातू, अडखळ, तुळशी, पाले परिसरातील भातशेतीला लष्करी अळीचा मोठा फटका बसला असून, उत्पादनात साठ टक्क्यांनी घट होणार आहे. 

विधानसभा निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे नेमके पुढे काय, हा प्रश्‍न ‘जैसे थे’च आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत. जिल्ह्यात निमगरवी भाताची शेती अडचणीत आली असून, सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र संकटात सापडले आहेत.  

याबाबत शेतकरी राकेश साळवी म्हणाले, की ज्या भागात भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे तिथे कृषी विभागाचे अधिकारी भेट देऊन मार्गदर्शन करतात. मात्र, किडीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद होत नाही. ती होणे गरजेचे आहे. केवळ नोंद वा सर्वेक्षण करून चालणार नाही, तर शासनाने नुकसानभरपाईही द्यावी.  शेतकरी अभय अंतरकर म्हणाले, की मॉन्सूनोत्तर पावसामुळे भात कापणी पूर्णपणे थांबवावी लागली आहे. अनेक शेतात पीक आडवे झाले आहे. उभ्या असलेल्या पिकातील दाण्याची मोठ्या प्रमाणात गळ सुरू आहे. या सर्व स्थितीचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com