राज्यभरात अन्नत्याग आंदोलन

अन्नत्याग आंदोलन
अन्नत्याग आंदोलन

मुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच शेतकरी विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १९) दिल्ली, मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.  १९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील बागायतदार शेतकरी कुटुंबातील साहेबराव करपे, मालती करपे या पती-पत्नींसह चार मुलांनी आत्महत्या केली होती. या घटनेला मंगळवारी १९ मार्च रोजी ३३ वर्षे पूर्ण झाली, परंतु राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला थांबलेला नाही.  सरकारने आपली धोरणे राबवण्यासाठी कायदे केले. सरकारे बदलली पण शेतकरी विरोधी कायदे बदलले गेले नाहीत. शेतकरी गुलाम आहेत म्हणून त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. खरे तर या आत्महत्या नसून, सरकारने व व्यवस्थेने पाडलेले खून आहेत. शेतकरी विरोधी कायद्यांपासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्यायला कोणी तयार नाही. याच्या निषेधार्थ १९ मार्च रोजी आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना स्मरून शेतकरी स्वातंत्र्यासाठी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग करण्यात आल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.  मुंबई व उपनगर परिसरातील शेतकरीपुत्र शेतकरी कृती समितीचे विवेक रणदिवे, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, शेतकरी संघटनेचे कडुअप्पा पाटील, किसानपुत्र प्रदीप म्हैसाने, शेतकरी संघटनेचे गणेश घुगे, गिरीश राऊत, संजय पारकर, सुधाकर गोसावी, कुंदन राऊत आदी या वेळी उपस्थित होते. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणीसह ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश तसेच राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नत्याग करत शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com