असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत व ओलित व्यवस्थापन

fertilizer management in citrus fruit crop
fertilizer management in citrus fruit crop

संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे गरजेचे आहे . संत्रा-मोसंबीचा आंबिया बहार  

  • थंडीच्या काळातील कमी तापमानामुळे निसर्गतः संत्रा-मोसंबीची झाडे विश्रांती घेतात. या काळातील वातावरण पोषक नसल्यामुळे झाडांवर नवीन वाढ होत नाही. या विश्रांतीच्या काळात अतिरिक्त साखरेचा संचय झाडाच्या ६ ते ९ महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो.  
  • संत्रा-मोसंबीच्या आंबिया बहाराला नैसर्गिक बहार म्हणतात. या बहारामध्ये संत्रा-मोसंबी झाडाची वाढ कडाक्याच्या थंडीत थांबते. डिसेंबरचा दुसरा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधरणतः १० अंश सेल्सिअसच्या खाली राहते. एवढ्या कमी तापमानावर झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाही.
  • झाडास ताण बसला हे कसे ओळखावे ?  

  •  ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी आणि नंतर पूर्ण बंद करावे.  
  •  ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिकट व नंतर पिवळी पडतात. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे २५ टक्के पानगळ झाल्यास, ताण बसला असे समजावे. अशाप्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो. 
  • आंबिया बहाराकरिता खत नियोजन 

  • जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमानात वाढ होताच हलके ओलीत करावे. ताण तोडताना हलक्या ओलिता अगोदर प्रत्येक झाडाला ६०० ग्रॅम नत्र + ४०० ग्रॅम स्फुरद + ४०० ग्रॅम पालाश आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे.  
  • ताण सोडल्यानंतर २० ते २५ दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यांत विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.
  • ओलित व्यवस्थापन  

  • आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा साठा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.  
  • जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. त्यामुळे आंबिया बहर घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.  
  • ओलितासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  • वाफ्याला आच्छादित करणे  

  • वाफ्यातील ओलावा टिकविण्यासाठी ६ सेंमी जाडीचा गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकून राहतो व फळांची गळ कमी होते. तसेच जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होते. 
  • संत्रा बहाराची निगा राखणे 

  • बहार आल्यानंतर सर्वच फुलांचे फळात रूपांतर होत नाही. बहारामध्ये बरीच फुले नर फुले असतात. त्यामुळे ही नर फुले गळून पडतात. त्यामध्ये फलन क्रिया होत नाही.  
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, हवामानाचा असमतोलपणा आणि किडींचा उपद्रव यामुळे फळांची गळ होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅगनिज सल्फेट आणि फेरस सल्फेट यांची २ ग्रॅम प्रति  लिटर पाण्यातून फवारणी करावी.  
  • संजीवकांचा समतोल साधण्यासाठी १० पीपीएम (१ ग्रॅम नॅपथिल ॲसेटित ॲसिड १०० लिटर पाण्यात) मार्च मार्च महिन्यात फवारणी करावी.  
  • या बहारावर ‘सिट्रस सायला’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव असतो. यासाठी क्लोरपायरीफॉस १ मिलि १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • संपर्कः डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com