सोलापूर : खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, कीटकनाशके व बुरशीनाशकांचा प्रमाणीत वापर केल्यास निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळू शकते, असे मत प्रगतिशील शेतकरी अतुल बाबर यांनी शनिवारी (ता.१६) येथे व्यक्त केले.
‘अॅग्रोवन'च्या वतीने येथे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात ‘निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन’ या विषयावरील चर्चासत्रात श्री. बाबर बोलत होते. श्री. बाबर म्हणाले, की द्राक्ष हे संवेदनशील आणि नाजूक फळपीक आहे. त्यादृष्टीने त्याच्या नियोजनामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. त्यातही निर्यातक्षम द्राक्षामध्ये त्याची सर्वाधिक गरज आहे. द्राक्षाची काढणी झाल्यानंतर किमान १५ दिवस तरी जमिनीला विश्रांतीची गरज आहे. ती द्यायलाच हवी. त्यानंतर मग छाटणी, विरळणी यासारखी कामे हाती घ्यावीत.
पाण्याचा, खताचा वापर योग्य पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आहे म्हणून पाणी देऊन नये, खताचे डोसही योग्य प्रमाणात, गरजेनुसारच द्यावेत, मी स्वतः कीड नियंत्रणासाठी गोमूत्र वापरतो. त्याचे निष्कर्ष चांगले आले आहेत. साधारणपणे फ्लॉवरिंगपर्यंत ते चांगले काम करते. द्राक्षामध्ये जीएचा उपयोग चांगला होतो. मुख्यतः घडाची लांबी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जीएमुळे घडातील पाकळ्यांचं अंतर वाढते, साधारण जीएचा स्प्रे २२-२३ व्यादिवशी घेतो. तर २८ ते ३० दिवसांला शेंडा स्टॉपिंग करतो.
ऐन मणी सेटिंगच्या काळात थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. घडांची संख्या कमी करताना काडीला सशक्त, निकोप पाहून एका काडीला एकच घड असावा, हे लक्षात घ्यावे.या वेळी त्यांनी द्राक्षातील विविध छोटी छोटी कामे सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगितली. शेतकऱ्यांनीही त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे विचारली.