सोयाबीन उत्पादनवाढीसाठी खत व्यवस्थापन महत्वाचे

श्रीकृष्ण  बावस्कर
श्रीकृष्ण बावस्कर

कोऱ्हाळा बाजार (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण रूपचंद बावस्कर गेल्या दहा वर्षांपासून सोयाबीनचे चांगले उत्पादन घेतात. एकात्मिक खत व्यवस्थापन, संरक्षित पाणी आणि वेळेवर कीड- रोग नियंत्रावर भर देत एकरी १३ क्विंटल उत्पादनाची सरासरी गाठली आहे.

श्रीकृष्ण बावस्कर यांची पाच एकर शेती आहे. सिंचनासाठी दोन विहिरी आहेत. स्वतःच्या शेतीसोबतच बावस्कर दरवर्षी इतर शेतकऱ्यांची दहा एकर शेती करायला घेतात. सोयाबीन आणि कापूस ही त्यांची मुख्य पिके आहेत. सोयाबीन लागवडीबाबत श्रीकृष्ण बावस्कर म्हणाले, की पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरवात करतो. पेरणी करताना दोन तासांतील अंतर एक फूट आणि दोन झाडांमधील अंतर तीन इंच राहील याची काळजी घेतो. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करतो. मी एकरी २५ किलो बियाण्याची पेरणी करतो. याचे कारण म्हणजे रोपांत योग्य अंतर राहते, वाढीच्या काळात हवा खेळती राहते. पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे झाडांची योग्य वाढ होऊन फांद्यांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी शेंगा अधिक लागतात. पिकाला एक वेळ डवरणी आणि गरज पडली तर तणनाशकाची फवारणी करतो.   खत व्यवस्थापनाबाबत श्रीकृष्ण बावस्कर म्हणाले, की माझ्याकडे सहा जनावरे आहेत, त्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. उन्हाळ्यात शेणखत मिसळून नांगरट करतो. चांगला पाऊस होऊन जमिनीत ओल निर्माण झाल्यानंतर तिफणीच्या साहाय्याने पेरणी करतो. पेरणी करताना सोबतच एकरी शंभर किलो १०ः२६ः२६ ही खतमात्रा देतो. तिफणीमागे मजुरांच्या साह्याने खत देतो. त्यानंतर पीक फुलोरावस्थेत असताना सरीमध्ये ०ः५२ः३४ हे एकरी १० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य पाच किलो असे सर्व मिश्रण करून एकत्रित खत देतो. शेंगा भरण्याच्या अवस्थेत शिफारशीत विद्राव्य खताची फवारणी केल्याने शेंगा चांगल्या पोसतात. शेणखताचा जास्तीत जास्त वापर आणि पिकाच्या गरजेनुसारच रासायनिक खतांची मात्रा दिल्याने वाढ चांगली होते. जमिनीची सुपीकता टिकून राहते.        पीक व्यवस्थापनाबाबत बावस्कर म्हणाले, की माझ्याकडे सिंचनासाठी विहिरीचे पाणी उपलब्ध असते. गेल्या काही हंगामांत पावसाचा खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या काळात पीक फुलोरावस्थेत असते. अशा काळात पिकाला पाण्याची नितांत गरज भासते. या वेळी पिकाच्या गरजेनुसार तुषार सिंचनाने पाणी देतो. या संरक्षित पाण्यामुळे पीक उत्पादनाला फायदा होतो. गरजेनुसारच कीडनाशकांची २ ते ३ वेळा फवारणी करतो, त्यामुळे वेळेवर कीड नियंत्रण होते. दर्जेदार बियाणे, एकात्मिक खत नियोजन, तुषार सिंचनाने संरक्षित पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापनातून मला एकरी १२ ते १३ क्विंटल उत्पादन मिळते.  

संपर्क - कृष्ण रूपचंद बावस्कर, ९६०४७४३४०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com