साताऱ्यात घनकचऱ्यातून १६८ टन खतनिर्मिती  

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्हा परिषदेने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला यश मिळू लागले असून, जिल्ह्यातील या प्रकल्पांतून १६८ टन खतनिर्मिती झाली आहे. किलोस दहा रुपये याप्रमाणे याची विक्री होत असून यामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात १७ लाखांची भर पडली आहे. त्याचे व्यवस्थापन होण्यासाठी २२३ कर्मचाऱ्यांचीही नियुक्‍ती करण्यात आली आहे. खतनिर्मितीत सातारा व कऱ्हाड तालुक्‍यांनी आघाडी घेतली आहे. 

सातारा जिल्हा परिषदेने राज्यात प्रथमच घनकचरा व्यवस्थापनासाठी व्यापक प्रमाणात प्रकल्प राबविला आहे. जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविला आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी त्यात आघाडी घेतलेली असून, या तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींनी ६० टन खत निर्माण केले असून, त्यांना पाच लाख २८ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाय एक हजार ४०२ लिटर व्हर्मिवॉशची निर्मिती केलेली आहे. त्यापाठोपाठ सातारा तालुक्‍यातील ३१ पैकी २४ ग्रामपंचायतींनी ७१ टन खत निर्माण केले.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) ठसा उमटविला आहे. शौचालय उभारणी व त्याच्या वापरात देशात तिसरा, ''ओडीएफ''मध्ये राज्यात प्रथम, तर स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात तृतीय स्थानावर जिल्हा राहिला. आता या अभियानाचा दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमातही जिल्हा परिषदेने मजल मारली आहे. डॉ. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, किरण सायमोते यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाला गती मिळत आहे. 

दरम्यान, घनकचरा प्रकल्प राबविण्यात सातारा जिल्ह्याने पुढाकार घेतला असला तरी आता पुढील टप्प्यात सांडपाणी व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे. सध्या नदी, विहिरींतील पाणी दूषित होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, पुनर्वापर होणे अत्यावश्‍यक आहे. जिल्हा परिषदेने त्याकडे लक्ष द्यायला हवे.  अध्यक्ष, सभापतींचा तालुका मागे  कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर, पाटणमधील ग्रामपंचायतींनी खतनिर्मिती केली आहे. मात्र, अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण तालुका, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचा जावळी, कृषी सभापती मनोज पवार यांचा खंडाळा तसेच वाई तालुक्‍यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना गती मिळालेली नाही. फलटणमध्ये पाच टन, खंडाळ्यात दोन, तर जावळीत अवघे तीन टन खतनिर्मिती झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com