सांगली ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभ क्षेत्रातील तलावात सोडण्यात आले आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील १०५ गावांतील १६३ तलाव पाण्याने भरले आहेत. यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पावणे दोन टीएमसी पाणी उचलले आहे, अशी माहिती पाटबांधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
कृष्णा नदीला येणाऱ्या पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात सोडावे. त्यातून लाभ क्षेत्रातील तलाव व बंधारे पाण्याने भरुन द्यावेत, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. त्यानुसार म्हैसाळ उपसा सिंचन योजना ऑगस्टमध्ये सुरु करण्यात आली. टप्प्या टप्प्याने म्हैसाळ योजनेचे विविध टप्प्यांवरील पंप सुरु करण्यात आले. सध्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या ७५ पंपाद्वारे हे पाणी उचलण्यात येत आहे.
योजनेच्या लाभ क्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील तलाव भरुन दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील ९१ गावांतील १४४ तलाव, बंधारे, लघू बंधारे पाण्याने भरले आहेत. तर, सोलापूर जिल्ह्यातील १४ गावांतील १९ तलावांत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील तलाव भरुन देण्यासाठी ९०० दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा वापर करण्यात आला आहे.
योजनेतून १.७५ टीएमसी पाणी उचलले आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील समारे ३० हजार हेक्टर क्षेत्रासाठी फायदा होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.