अमरावती ः खरीप हंगामासाठी शेतीला वेळीच पतपुरवठा होणे आवश्यक आहे. यात बॅंकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. परिणामी बॅंकांनी पतपुरवठ्यास टाळाटाळ करू नये, यासाठी कठोर धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी यशोमती ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत ही मागणी केली. लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थकारण प्रभावीत झाले आहे. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. इतर शेतमालाची स्थिती देखील अशीच आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरावर असलेल्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान सद्यःस्थितीत शेतकऱ्यांसमोर आहे.
अशावेळी बॅंक कर्जाच्या माध्यमातून होणाऱ्या पैशाचाच त्यांना आधार असतो. परंतू कर्ज देतांना बॅंका शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होतात. अनेक बॅंकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे अशा बॅंकांविरोधात कारवाईसाठी राज्यभरात कठोर पावले उचलण्यात यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. या माध्यमातून बॅंकांना सुस्पष्ट इशारा देण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
बॅंकांवर गुन्हा दाखल करा अमरावती जिल्हा खरीप आढाव बैठकीत कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाचप्रकारच्या कठोर कारवाईबाबत राज्यभरात पावले उचलण्यात यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.