सोलापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज

सोलापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शनिवारी (ता. २) शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तब्बल ३९३ अर्ज दाखल झाले. सोमवारी (ता. ४) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, मंगळवारी (ता. १९) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे नेमके चित्र त्याचवेळी स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख दिग्गजांमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर सौ. शोभा बनशेट्टी, माजी सभापती दिलीप माने, महादेव चाकोते, माजी आमदार रतिकांत पाटील, शिवशरण पाटील, प्रकाश वानकर, सुरेश हसापुरे, गोपाळराव कोरे, बाळासाहेब शेळके आदींचा समावेश आहे. 

शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ त्यासाठी होती. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्ते आणि नेत्यांनी आवार भरून गेले होते. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच अर्जांची संख्या तब्बल ४००च्या घरात गेली आहे. भाजप- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या पॅनेलची घोषणा केलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष आता नेत्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे स्वतंत्र पॅनेल करून लढण्याच्या तयारीत असल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही त्यांना तोंड देण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पालकमंत्री देशमुख कुंभारी मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांना शह देण्यासाठी आता सहकारमंत्री देशमुख यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

येत्या दोन दिवसांत उमेदवारांचा आढावा घेऊन सहकारमंत्री देशमुख पॅनेलची घोषणा करतील. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्यापही शांतता आहे. पण बहुतांश नेते, कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत. बाजार समितीचे तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळावर गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ही मंडळी अर्ज कसा भरणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण सूचकामार्फत अर्ज भरता येईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने श्री. माने, श्री. चाकोते यांच्या सूचकांनी त्यांचे अर्ज भरले.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ३७ अर्जांची विक्री झाली. पण अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मंगळवारी (ता. ५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस सर्वाधिक गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

पहिल्या दोन दिवसांत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल झालेला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष विविध गणांत प्रतिस्पर्ध्याचा कोणता उमेदवार येतो, याची चाचपणी करून आपल्या गटाचा उमेदवार ठरवत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. पण ऐनवेळी काय निर्णय होईल, हे सांगता येत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com