सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील निगुडे-रोणापाल (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत बागायतदार प्रवीण चौकेकर यांच्या बागेतील ३०० काजूच्या झाडांसह अन्य झाडे जळाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीत सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.
निगुडे रोणापाल येथे चौकेकर यांची मोठी बाग आहे. या बागेत ३०० हून अधिक काजूची झाडे आहेत. आंबा, नारळाची झाडेही बागेत आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास परिसरात अचानक आग लागली. ही आग लागल्याचे समजताच बागेचे मालक चौकेकर यांनी ग्रामस्थांसह बागेच्या दिशेने धाव घेतली. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. जोरदार वारा आणि कडक उन्हामुळे आगीचा भडका उडाला. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. अवघ्या काही मिनिटांत बागेतील ३०० झाडे जळाली. या शिवाय नारळ आणि आंब्याची देखील काही झाडे जळाली आहेत.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आग लागल्याचे समजताच सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, महावितरणचे अनिल यादव आदी घटनास्थळी पोहोचले. या वेळी उपस्थित सरपंच आणि ग्रामस्थांनी महावितरणवर ताशेरे ओढले. ही आग देखील शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. या पूर्वीही अनेकदा शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही.
नुकसानभरपाई द्यायची नसेल तर पंचनामे तरी कशासाठी करता, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी यादव यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहा महिन्यांत भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.