पाच वर्षांत १० हजार कोटींपर्यंत मत्स्योत्पादन नेणार : मुख्यमंत्री`

पाच वर्षांत १० हजार कोटींपर्यंत मत्स्योत्पादन नेणार : मुख्यमंत्री`
पाच वर्षांत १० हजार कोटींपर्यंत मत्स्योत्पादन नेणार : मुख्यमंत्री`

मुंबई : राज्यात मासेमारीतून होणारी ६ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. येत्या पाच वर्षांत राज्यात मत्स्य व्यवसाय सुविधा विकासाला प्राधान्य देऊन हे उत्पन्न १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आपण गाठू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. करंजा येथील मत्स्यबंदर विकासाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता.२५) केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या वेळी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर, बंदरे, राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की ज्या ज्या देशांचा विकास झाला तो सागरी मार्गानेच झाला आहे. सागर हा सामरिक आणि व्यापारी अशा दोन्ही शक्ती राष्ट्राला प्रदान करतो. ही शक्ती ओळखण्याचे काम प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी शक्तीला बळकट करण्यासाठी सागरमाला व नीलक्रांती या महत्त्वाकांक्षी योजना आखून सागरी अर्थ व्यवस्थेला चालना देण्याचे काम केले. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात सागरी प्रकल्प सर्वाधिक संख्येने आले. असे असले तरी जगाच्या तुलनेत इतका मोठा सागरी किनारा असूनही आपण मागेच आहोत. करंजा मत्‍स्‍य बंदरामुळे ससून डॉक वरील अलंबित्व कमी होईल. या कामासाठी केंद्र आणि राज्याचा १५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या बंदरावर एकत्रित मासेमारी केंद्र तयार करण्याचाही विचार आम्ही केला असून त्याचाही अंतर्भाव या कामात केला आहे. मासे निर्यात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रक्रिया एकाच छताखाली करण्याची सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येईल. त्यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढेल. राज्य शासन ससुन डॉक चे ही आधुनिकीकरण करत आहे, असे त्यांनी सांगितले. सागरमाला योजनेत महाराष्ट्राने दिलेले सर्व ४२ प्रकल्पांपैकी २४ प्रकल्पांना मान्यता मिळाली असून, उर्वरित प्रकल्पांचीही मान्यता लवकरच मिळेल. नील क्रांती योजनेतील २९ प्रकल्पांना मान्यता मिळाली असून १७५ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील मासेमारीचे उत्पादन १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोकणच्या भूमिपुत्रांना स्थान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले, की करंजा मत्स्य बंदराच्या भूमिपूजनाने एका मोठ्या कार्याची सुरवात होत आहे. सागरी व नद्यांच्या जलवाहतुकीच्या क्षमतांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनातून सागरमाला प्रकल्पात १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. जेएनपीटीच्या क्षमता विकासातून तेथे सव्वा लाख तरुणांना रोजगार मिळेल. मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीत कोकणच्या भूमिपुत्रांना स्थान देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com