सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ५२२ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे नजर अंदाजे पंचनामा अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पंचनाम्याचे काम सुरू आहे. बाधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काढणीच्या वेळीच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिके हातची गेली आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात सातत्याने अतिवृष्टी झाल्याने शेतात पिके कुजू लागली आहेत.
जिल्ह्यातील ९१ पैकी तब्बल ७६ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. कृषी विभागाने शेतमालाच्या नुकसानाची अंदाजित आकडेवारी घेतली आहे. त्यामध्ये तब्बल पाच हजार ५५२ हेक्टर क्षेत्रातील भात, सोयाबीन, घेवडा, बटाटा, वाटाणा, कांदा, द्राक्ष, आले, ऊस, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
ही आकडेवारी नजर अंदाजित असून यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील ५३४ गावांतील एक हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजून महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. अजूनही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)
सातारा-१२७, कोरेगाव-१२७, खटाव-५७२, कऱ्हाड-२५३, पाटण-६५०, खंडाळा-१२५, वाई-३७०, जावळी-२१०, महाबळेश्वर-१८५, फलटण-१,५१३, माण-१,३९०.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.