सांगली उपनगरात पुराचे पाणी

सांगली पूर
सांगली पूर

सांगली  : सांगलीत कृष्णा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर गेले आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी (ता. ४) सकाळी नऊ वाजता पाणीपातळी ४१ फूट होती. रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील उपनगरेही पाण्यात गेले आहेत. चांदोली धरणात चौथ्या दिवशीही अतिवृष्टी सुरू आहे. रविवारी (ता. ४) सकाळपर्यंत २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणातून २० हजार ४७२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील प्रमुख चार पुलांसह दहा बंधारे आणि ११ रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, दोन्ही धरणांतील विसर्गामुळे दोन्ही नदीकाठांवरील २३८ गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीपासून नदीकाठचा शहरातील मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, साई कॉलनी, कर्नाल रोड या भागांतील परिसर पुन्हा पाण्याखाली गेला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, काल रात्री एक वाजता मौलानानगर भागातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.  तसेच, मगरमच्छ कॉलनीतील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यापूर्वीही चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची सोय महापालिकेच्या शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक २५ येथे करण्यात आली आहे. सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरणातून काल पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी संध्याकाळपर्यंत सांगलीत पोचणे शक्य आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे; तसेच वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठावरील गावे आणि वस्त्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागात पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाने पूरस्थितीची पाहणी करण्यास सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. सध्या नदी व ओढ्यात पाणी वाढत आहे. त्यामुळे नदी आणि ओढ्याकाठच्या नागरिकांनी प्रामुख्याने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

२००५ च्या आठवणी जाग्या २००५ मध्ये सांगलीत कृष्णा नदीला महापूर आला होता. त्या वेळी ५ ऑगस्टला आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ५३ फूट इतकी झाली होती. या महापुराला आज पंधरा वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा २००५ च्या पुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. 

धरणातून विसर्ग वारणा: २० हजार ४७२ क्युसेक कोयना: ५० हजार २१८ क्युसेक अलमट्टी: २ लाख  ८५ हजार क्युसेक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com