ढगफुटीने हाहाकार

पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीसदृश पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.
rain
rain

पुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीसदृश पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे जवळपास ५७ हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला. कोकणसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्यांचे, जनावरे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

कोकणातील सर्वंच भागांत पावसाने हाहाकार उडाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेकडो घरे अजूनही पाण्याखाली असून कित्येक घरांना पाण्याचा वेढा कायम आहे. कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. कनेडी येथील मल्हार पूल कोसळल्यामुळे दहाहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. घरावर दरड कोसळून दिगवळेतील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथे पुन्हा पुराचे पाणी वाहू लागले आहे. शेकडो घरे, गोठे कोसळले आहेत. रस्ते खचणे असे प्रकार पावसामुळे घडले आहेत. डोंगर खचल्यामुळे कित्येक घरांना धोका निर्माण झाला आहे. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली आहे. 

मध्य महाराष्ट्रात धरणक्षेत्रात कहर  कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांच्या धरणक्षेत्रात पावसाने कहर केला. पश्‍चिम घाटासह या परिसरातील अतिवृष्टीसदृश पावसामुळे शेतीचे हजारो हेक्टरचे नुकसान झाले. बांध फुटल्याने भात खाचरे वाहून गेली. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४०० मिलिमीटर पाऊस पडला. नीरा देवघर धरणात चोवीस तासांत तब्बल ३.१८, तर भाटघर धरणात २.३३, पानशेत धरणात १.४४ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली. खडकवासला, वडज, कळमोडी, वडीवळे या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग होत आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाऊस आहे. 

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. बहुतांश भागांत आकाशात ढगांची गर्दी कायम असून नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम होता. याशिवाय अतिवृष्टी रूपात बरसलेल्या पावसाने केलेले नुकसानही आता समोर येऊ लागले आहे. 

विदर्भात पावसाचे धुमशान  विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने हजारावर गावांचा संपर्क तुटला असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या ३१ दरवाज्यांतून ३३९० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे १५० पेक्षा अधिक जनावरे दगावली असून, पुरात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

कोल्हापूरला पुराचा विळखा  सर्व नद्यांचे पाणी धोकापातळीपर्यंत पोहोचल्याने कोल्हापूर जिल्ह्याला पुराने वेढले आहे. जिल्ह्यातील ११६ बंधारे पाण्याखाली होते. रस्त्यांवर पाणी आल्यामुळे जिल्ह्यातील ५३ गावांचा संपर्क तुटला. पन्हाळा तालुक्यातील २३ गावांचा संपर्क तुटला आहे. बाजारभोगावमध्ये २०० दुकानांत पाणी शिरले. जिल्ह्यात २२२१ हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. 

रायगडात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू  रायगड जिल्ह्यातील तळई गावात दरड कोसळून ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला. ३२ घरांवर दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ८० ते ८५ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पोलादपूर- सुतारवाडीमध्येही ११ व्यक्तींचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दरड कोसळून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ‘‘ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत,’’ अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या. 

धरणक्षेत्रात पावसाचे थैमान  धरणक्षेत्रात अक्षरशः मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. कोल्हापूरमधील तुळशी धरणक्षेत्रात ८९५ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा सर्वाधिक पाऊस पडला आहे. कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलिमीटर, नवजा येथे ७४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने तब्बल १४ धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.  या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू  शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरणांतून सोडण्यात आलेले पाणी (विसर्ग- क्युसेकमध्ये) :  कोयना ३५१७१, धोम ३७७१, कन्हेर ६७६८, वारणावती २४७२०, कासारी ३१६८, धोम बलकवडी ६४५८, उरमोडी ४३८३, तारळी ११३९४, खडकवासला ३४१२, वडज २११८, कळमोडी २८१९, वडीवळे ६२९४, आंध्रा ११९६, गोसे खुर्द ३३९०.  शुक्रवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) (सौजन्य : जलसंपदा विभाग)  तुळशी ८९५, कोयना ६१०, नवजा ७४६, वारणावती ५७४, दूधगंगा ४८०, राधानगरी ५६७, तुळशी ८९५, महाबळेश्‍वर ५९४, कासारी ३२१, पाटगांव ४३६, धोम बलकवडी ३९९, तारळी १९४, वडीवळे २१४, पवना २२७, कासारसाई २४४, मुळशी ३३२, टेमघर २७०, वरसगाव १७०, पानशेत १७०, मुळशी १७१, नीरा देवघर १४२, ताम्हिणी परिसर ५१४. 

तुळशी धरणक्षेत्रात ८९५ मि.मी. पाऊस  जिल्ह्यातील तुळशी (ता. राधानगरी) परिसरात शुक्रवारी (ता. २३) सकाळी आठ वाजपर्यंतच्या चोवीस तासांत ८९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा विक्रम असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली. तुफान पावसाने जलाशयात ०.६ टीएमसी पाण्याची वाढ झाली. सध्या जलाशय ८५ टक्के भरले आहे.  २०१९ ला २४ तासांत ४३६ मि.मी. पावसाचा विक्रम होता त्याच्या दुप्पट पाऊस झाला आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे गुरुवारी (ता.२२) सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत ४०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात सुमारे ४४०० क्‍युसेकने पाण्याची आवक होत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रात आजअखेर २१२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  पावसाचा दणका 

  • कोकणात अनेक भागांत पूरस्थिती कायम, शेकडो घरे पाण्याखाली 
  • कोल्हापुरात हजारो कुटुंबांचे स्थलांतर 
  • अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार हेक्टरला फटका 
  • अकोल्यात दीडशेवर जनावरे दगावली; एका व्यक्तीचा मृत्यू 
  • महाबळेश्‍वरमध्ये उच्चांकी ५९४ मिलिमीटर पावसाची नोंद 
  • तुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ८९५ मिलिमीटर पाऊस 
  • भात पट्ट्यात भात खाचरे गेली वाहून; रस्ते, पूल वाहतुकीसाठी बंद 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com