कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवात

पूरस्थिती निवळू लागल्याने स्वच्छतेची कामे वेगात सुरु आहेत
पूरस्थिती निवळू लागल्याने स्वच्छतेची कामे वेगात सुरु आहेत

कोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग मोकळे झाले आहेत. दहा ते बारा दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी (ता.१६) अनेक गावांमध्ये प्रवेश करणे शक्‍य झाले. मार्ग खुले होत असले तरी गावांशेजारील शेतांमध्ये मात्र पाणी तसेच साचून राहिल्याने नुकसानीची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात पूरस्थितीच्या कालावधीत ३६९ गावांमधून १ लाख २ हजार ४४१ कुटुंबांतील ४ लाख ७ हजार १३४ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी ३३ फूट सहा इंच इतकी होती आणि २५ बंधारे पाण्याखाली होते.

पुरामुळे संक्रमण शिबिरात आलेले अनेक नागरिक पाणी कमी होईल तसे घरी परतत आहेत. विशेष करून पंचगंगा तीरावरील  गावांत गतीने पाणी कमी झाले. जिल्ह्यात अद्यापही १८१ संक्रमण शिबिरे सुरू असून, त्यामध्ये ५६ हजार ३९४ लोकांची सोय करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्‍याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. कृष्णा नदीची पातळी अतिशय धीम्या गतीने कमी होत असल्याने अजून सुमारे दहा गावांचे मार्ग बंद आहेत. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कुरुंदवाड आगार वगळता अन्य आगारांची बस वाहतूक नियमित सुरू आहे. अनेक ठिकाणी चिखलामुळे मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील ३१० पूरग्रस्त गावांतील वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य; तसेच स्वच्छतेच्या कामांस प्राधान्य देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाकडून २ कोटी ८९ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली.

पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाला आहे. या परिस्थितीत गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य; तसेच स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन विखुरलेला कचरा गोळा करून, कचऱ्याचे वर्गीकरण; तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निधी वितरित करण्यात आला आहे.

यात २०११ च्या जनगणनेनुसार १००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना ५०,००० रुपये आणि १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये एक लाख विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घोषित केलेल्या ३१० पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामांसाठी दिला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com