गडचिरोली ः जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे ८ हजार ५३९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तीन हजार ७१६ हेक्टरवरील या पिकाच्या नुकसानीपोटी १ कोटी ८५ लाख ८३ हजार रुपयांचा दुसरा हप्ता उपलब्ध झाला आहे.
बारमाही नद्यांचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख. त्यामुळेच मॉन्सून काळात अतिवृष्टी किंवा लगतच्या राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका बसतो. नद्यांचे पात्र फुगत असल्याने नदीकाठावरील गावे प्रभावित होतात. या वर्षी सुमारे तीन हजार ७१६ हेक्टरवरील पिकांना पूर, अतिवृष्टीचा फटका बसला. या पूरग्रस्तांसाठी एक कोटी ८५ लाख ८४ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी शासनाकडून देण्यात आला. ४ हजार २७८ शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा करण्यात आली.
दरम्यान, ४ हजार २११ शेतकरी त्यानंतरही भरपाईपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी नुकताच १ कोटी ८५ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मिळाला. जिल्हास्तरावरुन तालुक्याला हा निधी पोचला. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे हा मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.